
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गेल्या काही दिवसांपासून, ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड नावाचे रसायन मिसळले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या बातमीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने इतके जोर धरले आहे की, सरकारी तेल कंपन्यांना स्पष्टीकरण देण्यास भाग पडले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अनेक पेट्रोल पंपांची तपासणी केल्याचे तेल कंपन्यांनी म्हटले आहे. यावरुन त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सध्या या व्हायरल होणाऱ्या दाव्यांवर, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी आता एक निवेदन जारी केले आहे. ज्यात म्हटले आहे की, रिफायनरींपासून ते पेट्रोल पंपांपर्यंत देशभरात पेट्रोलची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत असे दिसून आले की, क्लोराईडचे प्रमाण पूर्वी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा खूपच कमी आहे. पेट्रोलमध्ये अंदाजे ५०० मिलिग्रॅम क्लोराईड मिसळले जात असल्याचा दावा करण्यात आला होता. पण, तपासणीत असे उघड झालं की, त्याचे वास्तविक प्रमाण ० ते ३ मिलिग्रॅमच्या दरम्यान होते. त्यामुळे हा दावा फोल ठरला असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ई२० पेट्रोलमध्ये पाणी मिसळले जात नाही. तेल कंपन्या अंदाजे ९०,००० पेट्रोल पंपांच्या भूमिगत टाक्यांची दिवसातून ८ ते १२ वेळा तपासणी करत असते. पण, या तपासणीदरम्यान चार ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. जिथे तात्काळ कारवाई करून पुरवठा त्वरित थांबवण्यात आला आहे. शिवाय, दुरुस्तीनंतरच पुरवठा पुन्हा सुरू होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी मिसळले जात असल्याच्या वृत्तांमुळे जनतेने सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. विरोधी पक्षानेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण जेव्हा इंधनात पाणी आणि क्लोराईड मिसळले जाते, तेव्हा ते वाहनासाठी हानिकारक असते, कारण त्यामुळे इंधन पंप आणि इंजिनच्या भागांमध्ये गंज चढू शकतो. यामुळेच सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून थेट चौकशी केली आहे.