
शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत महाराष्ट्राचा वस्त्रोद्योग; ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाला चालना
असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या ‘५एफ विजन’—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, हवामान-अनुकूल धाग्यांच्या उत्पादनाला गती देणे आणि पारदर्शक व चक्रीय वस्त्रोद्योग परिसंस्था निर्माण करण्याच्या रणनीतींवर चर्चा करण्यात आली.
TET पुन्हा लांबणीवर! जूनचा पेपर फुटला अन् आता डिसेंबर उजाडणार; विद्यार्थ्यांचा संताप!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @२०४७’ या ध्येयाचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र ५एफ दृष्टिकोन—फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन—अंमलात आणत आहे. केवळ राज्यातील कृषी मालावर प्रक्रिया करणे हा यामागील उद्देश नसून, महाराष्ट्राचा कापूस, रेशीम, ताग आणि इतर शेती उत्पादनांपासून जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ब्रँड्स तयार करणे हा आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा विस्तार: वस्त्रोद्योगाशी महाराष्ट्राची दीर्घ आणि गौरवशाली परंपरा जोडलेली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचा झालेला उदय हा येथील ऐतिहासिक कापड गिरण्यांशी थेट जोडलेला होता. याच परंपरेचा पाया मजबूत करत, राज्य सरकार आता वस्त्रोद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करत आहे. नागपूरमधील ‘पीएम मित्रा पार्क’ आणि ‘अमरावती टेक्स्टाईल क्लस्टर’ यांसारखे प्रकल्प वस्त्रोद्योगाला नवीन गती देतील, रोजगार निर्माण करतील आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकट करतील, असे शिंदे म्हणाले.
उत्पादनाचा विस्तार केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित न ठेवता उद्योग हरित, डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यावरही भविष्यातील मॅन्युफॅक्चरिंग अवलंबून असेल, यावर त्यांनी भर दिला. राज्य सरकार इचलकरंजी आणि भिवंडीसारख्या प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये रेडीमेड गारमेंट क्लस्टर्सना प्रोत्साहन देत असून, यामुळे रोजगार, उद्योजकता आणि गुंतवणुकीचे नवे मार्ग खुले होत आहेत.
महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतांपासून ते जगाच्या बाजारपेठेपर्यंत, आपल्या वस्त्रोद्योगाच्या प्रवासाने प्रत्येक टप्प्यावर मूल्याची निर्मिती केली पाहिजे. आपले उद्दिष्ट केवळ अधिक उत्पादन करणे एवढेच नाही, तर शाश्वत, पारदर्शक आणि स्पर्धात्मक पद्धतीने उत्पादन करणे हे आहे, जेणेकरून प्रत्येक धाग्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांची ताकद, आपल्या उद्योगाचे नाविन्य आणि नव्या भारताची ओळख दिसून येईल. ५एफ विजन हे महाराष्ट्राला वस्त्रोद्योग, नाविन्यता आणि मूल्यवर्धित उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी मार्गदर्शक आराखडा प्रदान करते.”
महिला सक्षमीकरण: ‘लाडकी बहीण’ योजनेशी जोडलेल्या उपक्रमांद्वारे महिलांना आधुनिक शिवणकाम आणि वस्त्रनिर्मितीचे कौशल्य प्रदान करण्यावरही राज्य सरकार भर देत आहे. कौशल्य विकासाला रोजगार आणि उद्योजकतेशी जोडून, या उपक्रमांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या संधी निर्माण केल्या जात आहेत.
पैठणी आणि कोल्हापुरी उत्पादने जागतिक बाजारपेठेत: महाराष्ट्रातील पारंपारिक उत्पादने, ज्यामध्ये प्रतिष्ठित पैठणी साड्या आणि कोल्हापुरी चपलांचा समावेश आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रमोट केले जात आहे. भायखळा येथील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर ‘टेक्स्टाईल, क्राफ्ट अँड कल्चरल म्युझियम’ (वस्त्रोद्योग, हस्तकला आणि सांस्कृतिक संग्रहालय) विकसित केले जात आहे. हे संग्रहालय भारत आणि जगभरातील पर्यटकांसमोर महाराष्ट्राचा समृद्ध वस्त्रोद्योग, हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करेल.
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा: महाराष्ट्राचे विस्तारणारे पायाभूत सुविधांचे जाळे जागतिक मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यात केंद्र म्हणून राज्याचे स्थान अधिक मजबूत करेल. समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए (JNPA) बंदर यामुळे कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारेल आणि महाराष्ट्रात तयार झालेली उत्पादने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक वेगाने पोहोचू शकतील.
राज्याचे धोरणात्मक स्थान आणि तयारी अधोरेखित करताना, असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद हर्डीकर म्हणाले, “या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मजबूत औद्योगिक आधार, उद्योजकीय परिसंस्था, उत्पादन क्षमता, जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा आणि समृद्ध वस्त्रोद्योग क्षेत्रासह महाराष्ट्र शाश्वत उत्पादन, नाविन्यता, गुंतवणूक आणि निर्यात-उन्मुख वाढीद्वारे भारताचे ५एफ व्हिजन पुढे नेण्यासाठी सज्ज आहे.”
ते पुढे म्हणाले, “फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन हे ५एफ व्हिजन केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित मार्गदर्शक आराखडा नाही; तर ती एक एकात्मिक, भविष्यासाठी सज्ज वस्त्रोद्योग मूल्य साखळी निर्माण करण्याची रूपरेषा आहे. येत्या काळात, जागतिक स्पर्धात्मकता केवळ क्षमता, उत्पादकता आणि उत्पादन वैविध्यतेवरून ठरत नाही, तर आपण कच्चा माल किती जबाबदारीने मिळवतो, पर्यावरणावरील आपला प्रभाव कसा व्यवस्थापित करतो, सामाजिक उत्तरदायित्व कसे जपतो आणि संपूर्ण पुरवठा साखळीत पारदर्शकता कशी सुनिश्चित करतो यावरून ठरेल. या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी सर्व आवश्यक घटक भारताकडे आहेत. आता आपल्याला अधिक एकत्रीकरण, मजबूत सहकार्य आणि सस्टेनेबिलिटीला (पर्यावरणपूरकतेला) केवळ नियमांचे पालन करण्यापुरते मर्यादित न ठेवता त्याला स्पर्धात्मक फायद्याच्या स्रोतात बदलण्याच्या सामूहिक कटिबद्धतेची गरज आहे.”
असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेच्या सस्टेनेबिलिटी क्षेत्राच्या अध्यक्षा श्रीमती चिन्मयी देउळगावकर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात भारताचे ५एफ व्हिजन पुढे नेण्यासाठी आणि एक सक्षम, शाश्वत व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक वस्त्रोद्योग परिसंस्था निर्माण करण्यासाठी धोरणकर्ते, उद्योग, तंत्रज्ञान प्रदाते आणि इतर सर्व भागधारकांमध्ये समन्वित कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘कंट्रोल युनियन’च्या सहकार्याने तयार केलेल्या ‘असोचॅम नॉलेज पेपर’चे प्रकाशनही केले. हा अहवाल भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला आकार देणाऱ्या मुद्द्यांवर उद्योग आणि धोरणकर्त्यांशी चेंबरच्या सातत्यपूर्ण सहभागाला अधोरेखित करतो.
मुंबई महापालिका मुख्यालय आता ‘AI’च्या निगराणीखाली; जुन्या इमारतीत बसणार ८७ अत्याधुनिक CCTV