(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात २२,६१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी गेल्या १७ महिन्यांतील सर्वोच्च गुंतवणूक ठरली होती. मात्र, मार्च सुरू होताच चित्र पुन्हा पालटले आहे. याआधी जानेवारीत ३५,९६२ कोटी, डिसेंबरमध्ये २२,६११ कोटी आणि नोव्हेंबरमध्ये ३,७६५ कोटी रुपयांची विक्री विदेशी गुंतवणूकदारांनी केली होती.
बाजार तज्ज्ञांच्या मते, या मोठ्या विक्रीमागे प्रामुख्याने तीन मोठी कारणे आहेत: भू-राजकीय तणाव: पश्चिम आशियातील (इराण-इस्रायल-अमेरिका) वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण आहे. ‘एंजल वन’चे तज्ज्ञ वकारजावेद खान यांच्या मते, होर्मुज सामुद्रधुनीतील संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर (ब्रेंट क्रूड) प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेले आहेत.
रुपयाची ऐतिहासिक घसरण: डॉलरच्या तुलनेत रुपया सध्या ९२ च्या पातळीवर पोहोचला आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारातील गुंतवणुकीवर परतावा मिळवणे कठीण जात आहे.
चीन आणि तैवानची ओढ: ‘जिओजित इन्व्हेस्टमेंट्स’चे मुख्य रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, भारताच्या तुलनेत सध्या दक्षिण कोरिया, तैवान आणि चीनचे बाजार अधिक आकर्षक वाटत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आपला पैसा भारतीय बाजारातून काढून इतर देशांकडे वळवत आहेत.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर (Corporate Earnings) परिणाम होण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्यास देशाच्या विकासदरावरही (GDP Growth) परिणाम होऊ शकतो, या भीतीपोटी विदेशी गुंतवणूकदार सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
महत्त्वाची सूचना: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा (Financial Advisor) सल्ला नक्की घ्या.






