
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गणेश चतुर्दशी, नवरात्री, दसरा, दिवाळी आणि छठ यांसारख्या आगामी सणांमुळे साखरेच्या दरात आणखी घट होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने ‘X’ वर पोस्ट करून साखरेबाबत माहिती दिली आहे. ‘X’ वर केलेल्या पोस्टनुसार, देशातील किरकोळ बाजारात साखरेची किंमत सुमारे ५ टक्क्यांनी कमी झाली आहे. यापूर्वी साखरेच्या एक्स-मिल दरात सुमारे २० टक्क्यांची मोठी घसरण झाली असल्याची माहिती दिली आहे.
साखरेच्या बाजरातील आकडेवारीनुसार, गुरुवारी संध्याकाळी आलेल्या दरांनुसार साखरेचे भाव ६१ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. ३ सप्टेंबर रोजी दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि रांचीमध्ये साखर ६१ रुपये प्रति किलो दराने विकली गेली होती. गुवाहाटी, कानपूर आणि रायपूरमध्ये ती ६२ रुपये प्रति किलो, तर चेन्नईमध्ये ६३ रुपये प्रति किलो इतका दर होता.
सरकारच्या म्हणण्यानुसार, एक्स-मिलमधील घसरलेल्या दरांचा परिणाम किरकोळ बाजारात हळूहळू दिसू लागला आहे. येत्या काही दिवसांत साखरेचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या मते, गिरणीतील घसरलेल्या दरांचा परिणाम किरकोळ बाजारापर्यंत पोहोचायला काही वेळ लागतो, त्यामुळे त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत अधिक स्पष्टपणे दिसून येऊ शकतो. त्यामुळे साखरेचे सध्याचे उतरलेले भाव हे सुरुवात असल्याचं मानलं जाऊ शकतं. जर कारखान्यातील साखरेचे दर कमी होत राहिले तर घाऊक बाजारानंतरही किरकोळ साखरेचे दरही उतरणार असल्याची शक्यता आहे.
ऑगस्टमध्ये साखरेच्या दरात अचानक कडाडून वाढ झाली होती. यानंतर सरकारने साखर बाजारावरील आपला लक्ष्य वाढवला. साठेबाजी आणि सट्टेबाजी यांसारख्या कारवायांना आळा घालण्यासाठी साखरेचा साठा, विक्री आणि बाजारभावावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले विविध नियम आणण्यात आले त्यामुळे कारवाया करुन आळा घालण्यास मदत झाली.
बाजारात साखरेची पुरेशी उपलब्धता आणि पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं.
देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पुरेशी उपलब्धता, पद्धतशीर पुरवठा आणि किंमत स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत असल्याचे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने म्हटले आहे. सध्या सरकारचे ताजे आकडे ग्राहकांना दिलासा देणारे आहेत. ऑगस्ट महिन्यातील वाढीनंतर आता साखरेचे दर घसरण्याचा कल असून, त्याचा फायदा हळूहळू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू लागला आहे.