
40 गुणांची परीक्षा ठरली वादग्रस्त; आता 50 गुणांमध्ये रूपांतर करून निकाल जाहीर होणार; हरणे महाविद्यालयाच्या परीक्षा गोंधळावर विद्यापीठाचा निर्णय
बी.आर. हरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाने आंतरिक परीक्षा पन्नास गुणांची घेणे बंधनकारक होते. परंतु हरणे महाविद्यालयाने पन्नास गुणांऐवजी चाळीस गुणांची आंतरिक परीक्षा घेतल्याचा चुकीचा प्रकार काही दिवसापूर्वी घडला. दरम्यान महाविद्यालयाने केलेल्या चुकीची कल्पना विद्यापीठाने निदर्शनास आणून दिल्यानंतर महाविद्यालयाने पन्नास गुणांची खोटी प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडे सादर करून चुकीचे गुण पण विद्यापीठाला सादर केले. या सर्व प्रकारामुळे विद्यापीठाने जवळपास सहा ते सात महिने निकाल राखून ठेवला. सहा महिन्यानंतर फक्त पस्तीस विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला. प्रत्यक्षात चाळीस गुणांची उत्तरपत्रिका असताना पन्नास गुणांची दाखवून विद्यापीठ व विद्यार्थी यांची फसवणूक हरणे महाविद्यालयाने केल्याचा आरोप शिवेसेनेच्या पाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यावी लागणार होती. विद्यार्थ्यांसोबत पालकांतमध्येही नैराश्य व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण विद्यार्थी व पालकांनी शिवसेना आमदार राजेश मोरे ह्यांच्या सहकार्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे धाव घेत समस्या सोडविण्याबाबत पत्रव्यवहार केला.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात यांनी त्वरित विद्यार्थी व पालकांसोबत नाशिक येथे जाऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ-परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ. सीताराम कडू यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. महाविद्यालयाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना पडू नये यासाठी चाळीस गुणांना पन्नास गुणांमध्ये रूपांतरित करून सर्व निकाल एका दिवसात जाहीर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच महाविद्यालयाने केलेल्या चुकीबद्दल कडक कारवाई करण्याची आश्वासनही डॉ.सीताराम कडू यांनी शिवसेना सचिव वैभव थोरात व विद्यार्थ्यांना दिले. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर दिव्या जेठवानी उपस्थित होत्या.