
अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाही
पुणे : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीसाठी प्रवेश निश्चित करण्याची मुदत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील अतिवृष्टीमुळे ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या तीन जिल्ह्यांतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
राज्यातील शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकूण ९६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ९ लाख ७५ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या विशेष फेरीसाठी ४ लाख ८४ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (महाविद्यालय पसंतीक्रम) अंतिम केले होते. त्यापैकी ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना ३ जुलै रोजी महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले.
४ जुलैपर्यंत १ लाख ९७ हजार ३८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून १ लाख ८९ हजार ६५९, तर इन-हाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोट्यांतून ७ हजार ७२२ प्रवेश निश्चित झाले आहेत. पूर्वी प्रवेश निश्चित करण्यासाठी ३ जुलै दुपारी ४ ते ६ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे विद्यार्थी आणि पालकांना अडचणी निर्माण झाल्याने ही मुदत ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
कार्यवाही मुदतीत पूर्ण करावी
या कालावधीत विद्यार्थ्यांनी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा. संबंधित महाविद्यालयांनीही प्रवेशाची पुष्टी, नकार अथवा रद्द करण्याची कार्यवाही याच मुदतीत पूर्ण करावी.
सुधारित वेळापत्रक
सुधारित वेळापत्रकानुसार ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. ८ जुलैपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांशी संबंधित डेटा प्रक्रिया करण्यात येणार असून, ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.