
पात्र उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांची माहिती
महाटीईटीचे आयोजन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ मधील पात्र उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्रांचे वितरण १८ मे ते ८ जून २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केलेल्या (Career) सूचनेत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चे आयोजन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्रमांक १ (इयत्ता १ ली ते ५ वी स्तर) आणि पेपर क्रमांक २ (इयत्ता ६ वी ते ८ वी स्तर) यांचा अंतिम निकाल ३ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता.
परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयांकडे तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या अधिकृत http://www.mscepune.in संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अथवा मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमाणपत्र स्वीकारताना उमेदवारांना महाटीईटी प्रवेशपत्राची प्रत, गुणपत्रिकेची प्रत, डी.टी.एड. किंवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.
महाराष्ट्र TET 2026 परीक्षा कधी होणार? कधीपर्यंत भरता येईल फॉर्म? जाणून घ्या
महाराष्ट्र TET 2026 परीक्षा कधी होणार?
राज्यातील शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ संदर्भात राज्य परीक्षा परिषदेकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा बंधनकारक असल्यामुळे हजारो उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होणार असून १६ एप्रिल २०२६ पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी दिलेल्या कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या टीईटी परीक्षेत सुमारे ५० हजार उमेदवार पात्र ठरले होते. मात्र अजूनही अनेक उमेदवार पात्र होऊ शकले नसल्याने त्यांच्यासाठी ही पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे.