
iit bombay student
Motivational Story : आयुष्यात अनेकदा आपल्याला असे वाटते की, एक वाईट निकाल आपले संपूर्ण भविष्य ठरवतो, पण वास्तवात तो केवळ एक टप्पा असतो, संपूर्ण यश नाही. ही अशीच कथा आहे जैनेंद्रजीत यांची, ज्यांनी दहावीच्या वर्गात मिळालेल्या कमी गुणांना आपली कमजोरी बनवण्याऐवजी नव्या बदलाची सुरुवात केली. त्यावेळी कदापि त्यांना अंदाज नसेल की, हाच निकाल भविष्यात त्यांची सर्वात मोठी ताकद बनेल. एका सामान्य मुलाने कशा प्रकारे अपयशाला हिमतीत बदलले आणि देशातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला, हे जाणून घेऊया.
जैनेंद्रजीतने दहावीच्या वर्गात केवळ ५४% गुण मिळवले होते. गणितात त्यांना केवळ ४१ आणि विज्ञानात ४८ गुण मिळाले होते. वृंदावनच्या जवाहर नवोदय विद्यालयतून शिक्षण घेतलेल्या जैनेंद्रजीत यांना स्वतःच्या निकालावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी वेबसाइट उघडून आपला स्कोर पाहिला, तेव्हा ते तिथेच थक्क झाले आणि हा त्यांचा निकाल असूच शकत नाही, असे त्यांना वाटले. जेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या अनेक मित्रांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तेव्हा त्यांची चिंता आणखी वाढली. परंतु, तीन वर्षांनंतर याच मुलाने JEE Advanced परीक्षा उत्तीर्ण करून देशातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजेच IIT Bombay मध्ये प्रवेश मिळवला. ही गोष्ट सिद्ध करते की, एक वाईट निकाल कोणाचेही संपूर्ण आयुष्य ठरवत नाही.
दहावीच्या खराब निकालामागे त्यांची प्रकृती हे देखील एक मोठे कारण होते. बोर्ड परीक्षांच्या आधी ते जवळपास ४० ते ५० दिवस बेड रेस्टवर होते, ज्यामुळे ते नीट तयारी करू शकले नव्हते. निकाल आल्यानंतर त्यांना लोकांच्या टीका आणि टोमणे देखील सहन करावे लागले, अनेकांनी त्यांच्या कमी गुणांची खिल्लीही उडवली. परंतु, जैनेंद्रजीत यांनी या निकालाला आपल्या गुणवत्तेचा पुरावा मानले नाही. त्यांनी याकडे एक संकेत म्हणून पाहिले की, त्यांना अभ्यासाची पद्धत बदलण्याची गरज आहे. येथूनच त्यांच्या खऱ्या मेहनतीची सुरुवात झाली आणि त्यांनी ठरवले की ते आपल्या पुढील प्रवासात कोणतीही कसर सोडणार नाही.
IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..
दहावी नंतर जैनेंद्रजीत यांनी केवळ अभ्यासाचे तास वाढवले नाही, तर अभ्यास करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलली. त्यांनी एक वेळापत्रक तयार केले, सोशल मीडिया आणि इतर गोष्टींपासून लक्ष दूर केले आणि हळूहळू दररोज सुमारे १० तास अभ्यास करू लागले.
क्लासला जाण्यापूर्वी ते त्या टॉपिकशी संबंधित एज्युकेशनल व्हिडिओ पाहत असत, जेणेकरून वर्गात समजण्यास सोपे जावे. त्यांनी मोठ्या सिलिबसचे लहान-लहान लक्ष्यांमध्ये विभाजन केले आणि दररोजचे टार्गेट ठरवून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हा देखील त्यांच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग बनला. या मेहनतीचे फळ असे मिळाले की, JEE Main २०२३ मध्ये त्यांना ९९.९८ पर्सेंटाइल मिळाले आणि JEE Advanced मध्ये त्यांनी AIR ३४९ प्राप्त केली.