
ai university
First AI University India: आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (AI) वाढते महत्त्व लक्षात घेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी काल म्हणजेच 14 जुलै रोजी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, कर्नाटक राज्यात देशातील पहिले सरकारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. यासोबतच एक ‘एआय हब’ देखील तयार केले जाईल, जिथे स्टार्टअप्स, संशोधक आणि कंपन्या एकत्र येऊन नवीन तंत्रज्ञानावर काम करू शकतील.
बंगळुरू येथे आयोजित ‘गुगल आय/ओ कनेक्ट इंडिया २०२६’ (Google I/O Connect India 2026) या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी एआय युनिव्हर्सिटी आणि हब संदर्भातील ही घोषणा केली. ते म्हणाले की, “प्रस्तावित एआय युनिव्हर्सिटीचे उद्दिष्ट जागतिक दर्जाचे एआय एक्सपर्ट्स (तज्ज्ञ) तयार करणे हे आहे. येथे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणासोबतच संशोधन आणि उद्योगांशी जोडण्याची संधी मिळेल. यामुळे विद्यापीठ, इंडस्ट्री आणि सरकार यांच्यात अधिक चांगला ताळमेळ विकसित होईल.”
शिक्षणात सुधारणा करण्यासोबतच आरोग्य सेवा अधिक चांगल्या करणे, शेतकऱ्यांना अचूक सल्ला देणे आणि सरकारी सेवा अधिक वेगवान व पारदर्शक बनवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.
प्रस्तावित एआय युनिव्हर्सिटीचा मुख्य परिसर बंगळुरूमध्ये सुमारे १०० एकर जागेवर विकसित केला जाईल. तसेच याचे प्रादेशिक कॅम्पस कलबुर्गी, बेळगावी, हुबळी-धारवाड, मंगळुरू आणि मैसूरू येथे स्थापन करण्याची योजना आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे नेते, उद्योजक, डेव्हलपर्स, संशोधक आणि धोरणकर्त्यांना संबोधित करताना शिवकुमार म्हणाले की, “एआय ही सध्याच्या पिढीतील सर्वात महत्त्वाची तांत्रिक क्रांती आहे.” त्यांनी याची तुलना स्टीम इंजिन, वीज, इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानाच्या आगमनाशी केली.
शिवकुमार यांनी माहिती दिली की, भारताच्या एकूण सॉफ्टवेअर निर्यातीत एकट्या कर्नाटकचा वाटा ४०% आहे. तर बंगळुरूमध्ये १७,००० हून अधिक स्टार्टअप्स आणि हजारो ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स कार्यरत आहेत, जे जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादने डिझाईन करतात.
कर्नाटकला एक ‘एआय-नेटिव्ह’ बनवणे हे सरकारचे ध्येय असून, याद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने प्रशासन आणि सार्वजनिक सेवांचे वितरण अधिक कार्यक्षम केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिवकुमार यांच्या मते, एआयच्या मदतीने शिक्षक अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतील, डॉक्टर आजारांचे वेगाने निदान करू शकतील, शेतकऱ्यांना उत्तम कृषी सल्ला मिळेल, नागरिकांना सरकारी सेवांचा थेट लाभ घेता येईल आणि लहान उद्योग आत्मविश्वासाने बाजारात स्पर्धा करू शकतील.
मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकसोबतच्या गुगलच्या दोन दशकांहून अधिक जुन्या भागीदारीचे कौतुक केले. बंगळुरू हे या कंपनीचे प्रमुख ग्लोबल इंजिनिअरिंग, रिसर्च आणि इनोव्हेशन सेंटर बनले आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच सर्च, अँड्रॉईड, युट्यूब, मॅप्स, क्रोम, जीमेल आणि गुगल पे यांसारख्या प्रॉडक्ट्सनी भारतीयांची माहिती मिळवण्याची, व्यवसाय करण्याची आणि सरकारी सेवा वापरण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे, असेही ते म्हणाले.
एआय युनिव्हर्सिटी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अति-आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना संशोधन, स्टार्टअप्स आणि मोठ्या टेक कंपन्यांसोबत काम करण्याच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध होतील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.