
TET
Maharashtra TET Exam Cancelled 2026 Paper Leak : राज्यभरात कित्येक विद्यार्थी आणि कार्यरत शिक्षक सध्या टीईटी (TET- Teacher Eligibility Test) परीक्षेच्या तयारीला लागले होते. ही परीक्षा २८ जून २०२६ रोजी महाराष्ट्रातील अनेक परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या शिक्षक पात्रता परीक्षेला उमेदवारांची रेकॉर्डब्रेक नोंदणी झाली होती. परंतु, आता टीईटीचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर येताच शिक्षण विभागाकडून उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या या परीक्षेच्या आधीच ठाणे परिसरात पेपर फुटल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आहे. काही टोळ्या उमेदवारांकडून पैसे घेऊन टीईटीचा पेपर पुरवत असल्याचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी ही माहिती तात्काळ शिक्षण विभागाला दिली.
सध्या या पेपर फुटीच्या प्रकरणात समाविष्ट असणाऱ्या संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांच्या ताब्यात असणारे हे लोक नेमके कोण आहेत? त्यांच्याकडे हा गोपनीय पेपर कसा व कोठून आला? यामध्ये कोचिंग संस्थांचा किंवा शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा हात आहे का? या संबंधित सर्व बाजूंचा तपास पोलिस करत आहेत.
सध्या या प्रकरणातील आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली असून पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर या रॅकेटचा मुख्य सुत्रधार समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून टीईटी (TET) परीक्षेसंदर्भात विविध कारणामुळे मोठी चर्चा रंगली होती. अशातच आता पेपर लीक झाल्यामुळे शिक्षण विभागाने ही परीक्षा रद्द करत परीक्षा स्थगितीचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाकडून काही वेळातच या संदर्भातील अधिकृत प्रेस नोट आणि सूचना जारी केली जाणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही शिक्षण मंत्रालयाला दिले आहेत.
उद्याच्या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. मात्र ऐन वेळी मिळालेल्या पेपरफुटीच्या माहितीमुळे परीक्षा स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. राज्यात वारंवार शासकीय आणि पात्रता परीक्षांचे पेपर लीक होणे, ही अत्यंत गंभीर बाब असून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळणाऱ्या दोषींबर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द झाला असून ही टीईटी राज्यात नकोच असल्याची भूमिका शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मांडली आहे. दैनंदिन अध्यापनाचा व टीईटी परीक्षेचा दुरान्वेही संबंध नसल्याने ही टीईटी परीक्षा रद्द करण्याची भूमिका ते राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे मांडणार आहेत.
आधीच दैनंदिन अध्यापनाबरोबरच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्याने या शैक्षणिक कामांमुळे शिक्षक त्रस्त झाले असून शिक्षकांना कोणी वालीच राहिला नाही नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात टीईटी तसेच बीएलओच्या कामांबाबत राज्यातील सर्व विधानसभेचे आमदार व विधान परिषद सदस्यांकडे शिक्षक महासंघाच्या माध्यमातून निवेदन देणार असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले.