मार्कशिट आणि सर्टिफिकेट्सची आता मिळणार एकच प्रत; हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा (File Photo : SSC)
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपासून आता ‘गुणपत्रक’ आणि ‘प्रमाणपत्र’ ही दोन स्वतंत्र कागदपत्रे न देता, ती दोन्ही एकत्रित स्वरूपात एकाच प्रतीवर दिली जाणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
आतापर्यंत विद्यार्थ्यांना निकालानंतर गुणपत्रक आणि काही काळानंतर प्रमाणपत्र अशी दोन वेगळी कागदपत्रे मिळत होती. ही महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे सांभाळून ठेवताना अनेकदा विद्यार्थ्यांची मोठी कसरत व्हायची. मात्र, मंडळाच्या या ‘दोन इन एक’ धोरणामुळे भविष्यात ही कागदपत्रे जतन करणे यामुळे सोपे होणार आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया किंवा नोकरीच्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करतानाही यामुळे सुटसुटीतपणा येणार आहे. राज्य मंडळाच्या नवीन धोरणानुसार, यावर्षी गुणपत्रकावरील विद्यार्थ्यांच्या नावाचा क्रमही बदलला जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना आपल्या नावातील किंवा माहितीतील त्रुटी सुधारण्यासाठीही शेवटची संधी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या नावांची आणि फोटोंची अचूकता तपासण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्याध्यापकांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष देऊन ही माहिती तपासून घ्यावी, अशा सूचना देखील राज्य मंडळाने दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी ‘हॉल तिकीट’ तपासावे
विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीटावरील नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख यांची पुन्हा एकदा बारकाईने खात्री करून घ्यावी. जर हॉल तिकीटावर नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा इतर माहितीमध्ये काही चूक असेल, तर विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या शाळेशी संपर्क साधून ती दुरुस्त करून घ्यावी. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर दुरुस्तीची प्रक्रिया अधिक क्लिष्ट होऊ शकते, त्यामुळे निकालापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार असून, राज्य मंडळाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांच्या हिताचा हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याची यामुळे चर्चा सुरू आहे.
हेदेखील वाचा : MAH-MCA CET 2026: राज्यातील १८५ केंद्रांवर परीक्षा उत्साहात; ९५.८४% विद्यार्थ्यांची विक्रमी उपस्थिती; कोणतीही तक्रार नाही






