
महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश
धाराशिव : महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागांसाठी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई या पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेस मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
पदनिहाय जागा व अर्ज संख्या चालक पोलीस शिपाईपदाच्या २५ जागा असून यासाठी १०,३८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर
पोलीस शिपाईपदासाठी १२३ जागा असून यासाठी ४,८१७ अर्ज आले आहेत. या आकडेवारीवरून भरती प्रक्रियेत तीव्र स्पर्धा असल्याचे स्पष्ट होत आहे.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून त्यासाठी टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. शारीरिक मोजमाप चाचणीत सर्व उमेदवारांची उंची व छाती मोजमाप तपासले जाईल. पन्नास गुणांच्या मैदानी चाचणीत शारीरिक मोजमापात पात्र ठरलेल्या उमेदवारांची धावणे व इतर शारीरिक कसोटीची मैदानी चाचणी घेतली जाईल. तर पन्नास गुणांच्या कौशल्य चाचणीत चालक पोलीस शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, जर कोणत्याही दिवशी तांत्रिक कारणामुळे मैदानी चाचणी घेता आली नाही, तर संबंधित उमेदवारांना पुढील योग्य तारीख देण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
शारीरिक व मैदानी चाचणीस उपस्थित राहताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. त्यात
महाआयटीकडून प्राप्त झालेले आवेदन अर्ज व प्रवेशपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालक परवाना (चालक पदासाठी अर्जदारांसाठी आवश्यक), सर्व संबंधित शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे ५ फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. कागदपत्रांची पूर्तता नसल्यास उमेदवारांना पुढील प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सर्वांनी पूर्वतयारीनिशी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करून शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे. पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या सूचनांची नोंद घ्यावी व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी केले आहे.