
आरटीई प्रवेशासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त
पुणे : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्रवेश घेण्याची मुदत १२ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी निश्चित करण्यात आलेली मुदत संपुष्टात येत असल्याने अनेक पालकांकडून मुदतवाढीची मागणी होत होती. त्यानुसार निवड यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना आता ४ जून ते १२ जून या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ही माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
राज्यात ‘आरटीई’ प्रवेशासाठी यंदा २ लाख ८९ हजार २८६ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली होती. त्यापैकी १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित निवड फेरीत ७९ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळाली आहे. याशिवाय प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीत १२ हजार ९५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, दुसऱ्या प्रतीक्षा यादीत ४०५ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे.
‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत अद्यापही राज्यभरात १२ हजारहून अधीक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश निश्चितीची प्रक्रिया संबंधित शाळांमध्ये निर्धारित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा : अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड
‘आरटीई’ प्रवेश दृष्टीक्षेप
एकूण नोंदणी – २,८९,२८६
निवड यादीतील विद्यार्थी – १,०५,८११
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी – ८६,०३४
नियमित निवड फेरी – ७९,७७६
प्रतीक्षा यादी (पहिली) – १२,९५०
प्रतीक्षा यादी (दुसरी) – ४०५
रिक्त जागा – १२,६८०
प्रवेशाची मुदत – १२ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.