
फोटो सौजन्य - Social Media
समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत Asmitā Law College च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या उत्कर्ष बालमंदिर, विक्रोळी येथील जयश्री श्रीराम हेवाळे हिच्या पुढील शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
विक्रोळीतील कन्नम्मवार नगर परिसरात राहणारी जयश्री ही अत्यंत साध्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहे. तिचे पालक रोजंदारीवर काम करत असल्याने तिच्या शिक्षणाचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत होते. मात्र, अस्मिता विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिची परिस्थिती लक्षात घेत तिला मदतीचा हात दिला. महाविद्यालयात आयोजित ‘आवर्तन’ या सांस्कृतिक कार्यक्रमात जयश्रीने सादर केलेल्या मराठी लावणीने उपस्थितांची मने जिंकली. तिच्या कलेतील आत्मविश्वास, भाव आणि मेहनतीने प्रभावित होऊन विद्यार्थ्यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत आर्थिक मदत उभी केली. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ३०,००० रुपयांची रक्कम शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. या मदतीमुळे जयश्रीच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून तिच्या भवितव्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या उपक्रमात महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील ध्रुविल प्रणील नायर, प्राध्यापक केशव तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अंतिम वर्षाचे विद्यार्थी विनोद विद्यागर, यश गिरी, डॉ. विष्णू बनसोडे, भावीन देडिहा, ऋतुजा कुडेकर आणि इतर विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी मिळून केलेल्या या प्रयत्नामुळे एक सकारात्मक सामाजिक संदेश समाजापुढे ठेवण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव जपली असल्याचे दिसून येते. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, या भावनेतून त्यांनी गरजू विद्यार्थिनीला मदतीचा हात दिला. त्यांच्या या कृतीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून समाजात सहकार्य आणि संवेदनशीलतेची भावना अधिक बळकट होईल. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, अशा सामाजिक जाणीवा असलेल्या तरुण पिढीमुळे समाजात सकारात्मक बदल घडण्याची आशा व्यक्त केली जात आहे.