
२१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो
Longest Day on Earth Explainer: पृथ्वीवर सर्वात लहान दिवस २१ डिसेंबर किंवा २२ डिसेंबर रोजी असतो, हे कदाचित तुम्हाला माहितीच असेल. त्या दिवशी कधी सकाळ होऊन रात्र होते, हे समजतच नाही. याउलट, उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात लांब किंवा मोठा दिवस २१ जून रोजी आहे. वर्ष २०२६ मध्ये २१ जून, रविवारी पृथ्वीवरील उत्तर गोलार्धातील देशांमध्ये वर्षातील सर्वात मोठा दिवस असेल. भारतासह उत्तर गोलार्धात या दिवशी दिवसाची वेळ सर्वात जास्त आणि रात्र सर्वात लहान असते. या खगोलीय घटनेला ‘ग्रीष्म अयनांत’ (Summer Solstice) म्हटले जाते.
२१ जून रोजी देशातील अनेक भागांत दिवसाचा कालावधी सुमारे १३ तास ५८ मिनिटांपर्यंत असू शकतो. मात्र, वेगवेगळ्या शहरांमधील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार यामध्ये काही मिनिटांचा फरक असू शकतो. वर्षातील या सर्वात लांब दिवसाच्या निमित्ताने सांगायचे तर, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते, परंतु तिची धरी सुमारे २३.५ अंशांनी (23.5°) कललेली असते. या झुकलेल्या स्थितीमुळे आणि सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या ताळमेळामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि दिवस-रात्रीच्या कालावधीत फरक दिसून येतो.
Rahul Gandhi Education: राहुल गांधी किती शिकलेत? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…
नासाच्या (NASA) खगोलशास्त्रज्ञांनुसार, २१ जून रोजी पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने जास्तीत जास्त कललेला असतो. याच कारणामुळे भारत, अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आशियातील बहुतांश देशांमध्ये २१ जून हा वर्षातील सर्वात लांब दिवस आणि सर्वात लहान रात्र घेऊन येतो.
कर्कवृत्तावर सूर्याची किरणे थेट पडत असल्याने सूर्य आकाशात त्याच्या सर्वोच्च स्थितीच्या जवळ दिसतो. या वेळी पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे अधिक कललेला असतो. याच कारणामुळे २१ जून रोजी भारतात दिवसाचा कालावधी वाढून सुमारे १३ तास ५८ मिनिटांपर्यंत पोहोचतो, तर रात्रीचा कालावधी घटून साधारण १० ते ११ तास एवढाच राहतो. म्हणूनच २१ जूनला वर्षातील सर्वात लांब दिवस आणि सर्वात लहान रात्र मानले जाते.
२१ जून रोजी केवळ दिवसच मोठा असतो असे नाही, तर दुपारच्या वेळी एक रंजक खगोलीय घटनाही पाहायला मिळते. विज्ञानाच्या भाषेत याला ‘झिरो शॅडो डे’ (Zero Shadow Day) म्हणजेच शून्य सावलीचा दिवस म्हटले जाते. या दरम्यान कर्कवृत्ताच्या आसपासच्या काही ठिकाणी सूर्य अगदी डोक्यावर येतो, ज्यामुळे वस्तूंची सावली अत्यंत लहान होते किंवा काही काळासाठी पूर्णपणे गायब झाल्यासारखी वाटते.
तथापि, ही परिस्थिती केवळ मर्यादित भागांत आणि काही काळासाठीच पाहायला मिळते. भारताच्या बहुतांश भागांत या दरम्यान सावली पूर्णपणे गायब होत नाही, तर ती सामान्य दिवसांच्या तुलनेत बरीच लहान झालेली दिसते.