
Suraj Ubale born without arms writes his 12th standard paper using his feet Nanded
Nanded News : नांदेड: कंधारच्या नवरंगपुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात बारावीच्या इंग्रजी पेपरची नेहमीची लगबग सुरू होती. घंटा वाजली, प्रश्नपत्रिका हातात आल्या आणि विद्यार्थ्यांचे लक्ष उत्तरपत्रिकेकडे खिळले. (HSC Exam 2026) मात्र या गर्दीत एक शांत, पण विलक्षण प्रेरक दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पायाच्या बोटांत पेन पकडून एक विद्यार्थी अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरपत्रिका लिहित होता. परीक्षा केंद्रातील अधिकारी, पर्यवेक्षक आणि शिक्षक क्षणभर स्तब्ध झाले; कारण तो होता गाडेगावचा जन्मतः हात नसलेला पण जिद्दी विद्यार्थी सूरज शिवराज उबाळे. “अडथळे शरीरात नसतात, ते मनात असतात,” हा संदेश त्या क्षणी जिवंत झाला होता. नियमांनुसार लेखनिक घेण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही सूरजने स्वाभिमानाची वाट निवडली. पायांनाच हात बनवत त्याने स्वतःच पेपर लिहिण्याचा निर्धार केला. (Nanded News)
त्याच्या शांत चेहऱ्यावर तक्रार नव्हत हतबलता नव्हती, होती फक्त एकाग्रत आणि जिद्दी. संघर्षातून घडलेले धैर्य. डॉ. ए. पी जे. अब्दुल कलाम सांगतात, “स्वप्न व नसतात जी झोपेत दिसतात, स्वप्न व असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. सूरजची प्रत्येक ओळ हे अशाच स्वप्नाचे सार्थ उदाहरण ठरत होते.
हे देखील वाचा : टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले! Harshvardhan Sapkal यांच्या विरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन
आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची नवी व्याख्या लिहिली
सूरजचे जीवन म्हणजे अडचणींना दिलेले सकारात्मक उत्तर आहे. जन्मतः हात नसतानाही त्याने दैनंदिन आयुष्याची प्रत्येक गोष्ट स्वतः शिकली. पायांच्या मदतीने जेवण, लेखन आणि इतर कामे करत तो स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे. शेतकरी असलेले त्याचे वडील शिवराज उबाळे यांनी मुलाला केवळ सहानुभूती नाही, तर आत्मविश्वासाचा वारसा दिला. दहावीमध्ये ६४ टक्के गुण मिळवत त्याने अभ्यासातही आपली क्षमता सिद्ध केली आहे. हेलन केलर म्हणतात, “जीवन म्हणजे धाडसी साहस, अन्यथा काहीच नाही. सूरजचा प्रवास ही त्या विचारांचीच साक्ष आहे. आजच्या काळात अनेक विद्यार्थी सहज मार्ग शोधताना दिसतात.
पण सूरजसारखे विद्यार्थी मेहनत, प्रामाणिकता आणि स्वाभिमान यांचे खरे उदाहरण ठरतात. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कॉपीमुक्त्तीचा कडक पॅटर्न राबवला जात असताना, सूरजची जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. स्वामी विवेकानंदांचे शब्द येथे आठवतात उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. सूरजने हेच तत्व आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्या दिवशी परीक्षा हॉलमध्ये फक्त उत्तरपत्रिका भरली जात नव्हती, तर जिद्द, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची नवी व्याख्या लिहिली जात होती. पायांनी उमटलेली अक्षरे जणू धैर्याची स्वाक्षरी होती.
हे देखील वाचा : अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! फेब्रुवारीतच गरमा गरम चटके; यंदा उन्हाळा तापणार
सुरज उबाळेने पेरले मनात आत्मविश्वासाचे बीज
कवी गुलजार यांच्या ओळीप्रमाणे, ‘हिम्मत की स्याही से लिखी, कहानी कभी मिटती नहीं.’ सूरजची ही कथा देखील तशीच अजरामर ठरणारी आहे. आणि म्हणूनच या प्रसंगाला अर्थ देणारा शेर पुन्हा ओठांवर येतो, “मंजिलें उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। कंधारच्या त्या परीक्षा केंद्रात त्या दिवशी एक विद्यार्थी पेपर लिहीत नव्हता; तो नव्या पिढीच्या मनात जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाची बीजे पेरत होता. काही कथा केवळ वाचल्या जात नाहीत. त्या अनुभवल्या जातात. सूरज उबाळेची ही कथा त्यापैकीच एक जिवंत प्रेरणा आहे.