
फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला तडा गेल्याचे चित्र समोर आले. राज्यभरात ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले, तर सोलापूर जिल्ह्यात तब्बल १० डमी विद्यार्थी आढळून आल्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात मराठीसह एकूण ९ भाषा विषयांचे पेपर पार पडले. पुणे विभागात सर्वाधिक १० विद्यार्थी कॉपी करताना आढळले, तर नागपूर विभागात १ विद्यार्थी पकडला गेला. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही अशा प्रकारांना आळा बसत नसल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याच्या घोषणांनंतरही प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे.
दरम्यान, मुंबईत परीक्षा केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला. कांदिवलीच्या चारकोप परिसरातील प्रियदर्शिनी विद्यालयात परीक्षा असल्याचे हॉलतिकिटवर नमूद होते. मात्र काही विद्यार्थ्यांची नावे केंद्राच्या यादीत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. जागेअभावी संबंधित विद्यार्थ्यांना दुसऱ्या ज्ञानवर्धिनी विद्यालयात पाठवण्यात आले. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मानसिक तणाव सहन करावा लागला. विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. “अचानक केंद्र बदलणे योग्य नाही. आधीच स्पष्ट माहिती दिली असती, तर अतिरिक्त ताण टाळता आला असता,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थी प्रथमेश झा याने दिली. तर अवलंब ठाकूर या विद्यार्थ्याने सांगितले की, सुरुवातीला आपले नाव यादीत नसल्याने भीती वाटली, मात्र नंतर दुसऱ्या केंद्रावर सीट मिळाल्याने दिलासा मिळाला.
दुसरीकडे, नाशिक विभागात पहिला पेपर पूर्णपणे कॉपीमुक्त पार पडल्याचे दिसून आले. परीक्षा संपल्यानंतर बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. यामुळे काही ठिकाणी शिस्तबद्ध नियोजन केल्यास कॉपी रोखणे शक्य असल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात मोठा गैरप्रकार उघडकीस आला. ओळखपत्र तपासणीदरम्यान १० डमी विद्यार्थी आढळून आले. यामध्ये ९ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनीचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी इतरांच्या ऐवजी परीक्षा देण्यासाठी आले होते. हा प्रकार लक्षात येताच केंद्रप्रमुखांनी तत्काळ कारवाई करत पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधितांवर बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. या सर्व घटनांमुळे दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिक काटेकोर नियोजन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.