
सोलापुरात कायदे क्षेत्रातील दिग्गजांचा महामेळावा!
या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भारताचे माजी सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती निजामोद्दीन जे. जमादार, मा. न्यायमूर्ती मिलींद जाधव, मा. न्यायमूर्ती मेहरोज पठाण तसेच माजी न्यायमूर्ती विनय जोशी उपस्थित होते.
यावेळी सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. मनोज शर्मा, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. मिलींद थोबडे, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. संग्राम देसाई, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख तसेच सहसचिव ॲड. मीरा प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
चर्चासत्रात न्यायव्यवस्थेतील बदलते प्रवाह, वकिली व्यवसायातील व्यावसायिक नैतिकता, न्यायदान प्रक्रियेत वकिलांची भूमिका, बदलत्या कायदेशीर संकल्पना आणि न्यायव्यवस्थेसमोरील समकालीन आव्हाने या विषयांवर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करताना वकिलांनी व्यावसायिक नैतिक मूल्यांची जपणूक करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश वक्त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक करत परिषदेमागील उद्देश स्पष्ट केला. वकिलांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी आणि अद्ययावत कायदेविषयक ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोपावेळी सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी उपस्थित न्यायमूर्ती, न्यायाधीश, बार कौन्सिलचे सदस्य, वकील, प्राध्यापक, विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवक तसेच आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
या परिषदेस उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वरिष्ठ विधिज्ञ, महाराष्ट्रातील विविध जिल्हा व तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील बंधू-भगिनी, विधी महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्मा स्मृती मंदिर परिसर दिवसभर कायदे क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने गजबजून गेला. उत्कृष्ट नियोजन आणि उच्च दर्जाच्या आयोजनाबद्दल उपस्थितांनी सोलापूर बार असोसिएशनचे विशेष कौतुक केले.