ठाणे: ठाण्यातून एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनने ठाणे शहर हादरून गेला आहे. एका १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीसोबत झालेल्या वादामुळे तिला पेटवून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणात १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. यापूर्वी ती मुंबईतील चेंबूर भागात कुटुंबासोबत वास्तव्यास होती. त्यावेळी तिची ओळख त्या भागात राहणाऱ्या एका मुलासोबत झाली होती. काही दिवसांपूर्वी मुलगी भाऊबीज निमित्ताने चेंबूर येथे गेली होती. त्या दरम्यान मुलाने तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केली. तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच, तिच्या बचावासाठी ते गेले. त्यांनी त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मुलीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या प्रकरणानंतर मुलगी खूप घाबरली होती.
घटनास्थळावरून फरार
२४ ऑक्टोबरला तिच्या ठाण्यातील घरात मुलगी एकटी होती. त्यावेळी अचानक त्यांच्या घरातून धूर येऊ लागला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी तिच्या आईला दिली. मुलीचे कुटुंबीय घरामध्ये आले असता तिचा मित्र घरामध्ये होता. तर मुलगी भाजलेल्या अवस्थेत ओरडत होती. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलीच्या कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलाला जाब विचारला असता, तो तिथून पळून गेला.
पीडित मुलीच्या आई वडिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १०९, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही एकमेकांना ओळखत असून त्यांच्यामध्ये, वाद झाला होता. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली आहे. मुलीवर उपचार सुरु आहे. तिच्या जबाबानंतर नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.






