
पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी
आळेफाटा : पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या कारला कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील बोटा येथील पाच भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना बुधवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील गुळंजवाडी शिवारात घडली आहे.
पंढरपूरहून परतणारी कार (एमएच १४ एनडी ३३७८) आणि समोरून येणारे पिकअप वाहन (एमएच २४ बीडब्ल्यू २८६२) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
स्थानिक ग्रामस्थ धावले मदतीला
या अपघातात जिजाभाऊ दत्तात्रय शेळके, चालक शिवाजी मेंगाळ, बाळासाहेब भागाजी मुसळे, सुभाष तुकाराम शेळके आणि आनंदा रामभाऊ मधे (सर्व रा. बोटा, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार पिकअप वाहनाचा वेग अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या साहाय्याने सर्व जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.