सौजन्य - नवराष्ट्र टीम
आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा बायपासवर शुक्रवारी (दि.२६) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या दिशेने कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरून भरधाव वेगाने रस्त्याबाहेर गेली. त्यानंतर कार दोन ते तीन वेळा पलटी होऊन रस्त्यालगत असलेल्या एका घराच्या पडवीवर जाऊन जोरदार आदळली.
अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील नागरिक घराबाहेर धावत आले. कारची झालेली अवस्था पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने कारमधील जखमींना बाहेर काढले आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात कारमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघातातील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे कारमधील दोन चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला. तीन वर्षांचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित असून, दीड वर्षांच्या बाळाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे घाबरून दोन्ही मुले रडत होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवत त्यांना चॉकलेट देऊन, प्रेमाने समजूत काढत शांत केले. या संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली. “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” या म्हणीचा प्रत्यय या घटनेत आला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू
घरच्यांचा निरोप घेत, व्यवसाय वाढविण्याची स्वप्ने उराशी बाळगत सहा जण बुधवारी रात्री दिल्लीकडे निघाले होते. दुसऱ्या दिवशी नव्या मशीनरीची खरेदी करून परत येण्याच्या गप्पा रंगल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवर गुरुवारी सकाळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि क्षणार्धात कुटुंबांचे आधारवड हिरावले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. संभाजीनगरात ही बातमी धडकताच व्यापारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.






