
रेणापूर परिसरात खळबळ! शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लातूर : रेणापूर तालुक्यातील कासारगाव येथे शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणात ९ जणांविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला होता. हा वाद इतका वाढला की संबंधित व्यक्तींनी धारदार व काठ्यांचा वापर करून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
रेणापूर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात शिवाजी बाबुराव आमण्णावर, गोविंद शिवाजी आमण्णावर, ज्ञानेश्वर शिवाजी आमण्णावर, गोवर्धन गोपाळ आमण्णावर, करण गोपाळ आमण्णावर, गोजरबाई शिवाजी आमण्णावर, राणी गोविंद आमण्णावर, सोनाली ज्ञानेश्वर आमण्णावर आणि गोपाळ शिवाजी आमण्णावर या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृत व्यक्ती मनोज उमर माणिक आमण्णावर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून, परमेश्वर माणिक आमण्णावर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं
दारू पिऊन त्रास देत असल्यावरून मुलीनेच आपल्या वडीलांचा चाकूने छातीत वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून, मुलीकडूनच वडिलांचा खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (वय ७०, रा. काशिवाडी) असे खुन झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (वय ४०, रा. पोलीस चौकीच्या समोर, काशिवाडी) हिला अटक केली आहे. हा प्रकार काशीवाडी पोलिस चौकीच्या समोर त्यांच्या राहत्या घरात रविवारी रात्री आकराच्या सुमारास घडला आहे. याबाबत जैनुद्दीन यांच्या पत्नीने तक्रारदार दिली आहे. जैनुद्दीन, त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारी हे एकत्र राहतात. त्यांची मुले वेगळी राहतात. दिलशाद हिचा विवाह झाला नाही. जैनुद्दीन फुलारी हे दारु पिऊन घरी आले. ते दिलशाद हिला शिवीगाळ करु लागले. तर त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात घरातील किचन ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू घेऊन दिलशाद हिने वडिलांच्या छातीवर वार केला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत अधिकरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.