
तीन कोटींचे आमिष, 7.35 लाखांचा गंडा; 'अशी' झाली फसवणूक उघड
छत्रपती संभाजीनगर : बर्फ कारखान्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने समाजसेविकेला तब्बल ७ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना २५ एप्रिल २०२२ ते २४ जून २०२६ दरम्यान सहकार नगरात घडली आहे. शैलेश बाबुराव कांबळे (रा. सिद्धीविनायक अपार्टमेंट, एन-३९, गादिया विहार) असे महिलेची फसवणूक करणाऱ्याचे नाव असून, त्याच्याविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कर्जप्रकरणाशी संबंधित शासकीय पत्रव्यवहार अर्जदारापर्यंत पोहोचू नये म्हणून आरोपीने चुकीचा पत्ता दिला, तसेच त्यावर स्वतःचा मोबाइल क्रमांक टाकण्यात आला. मात्र बँकेत धनादेश न वटल्याने सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
३ कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याची लालच
या प्रकरणात सविता गणेश पाथरे (वय ४१, रा. बजाजनगर, वडगाव कोल्हाटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या सुसंकल्प महिला मंडळ व सुसंकल्प निधी अर्बन लिमिटेडच्या अध्यक्षा असून, विविध बचत गटांना मार्गदर्शनाचे काम करतात. मार्च २०२२ मध्ये सुषमा व तातेराव गवई यांच्या माध्यमातून त्यांची आरोपी शैलेश कांबळे याच्याशी ओळख झाली. कांबळे याने स्वतःला मोठ्या कर्जप्रकरणांचा जाणकार असल्याचे सांगत बर्फ कारखान्यासाठी तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
तसेच बचत गटांनाही कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. कर्ज प्रक्रियेसाठी विविध खर्च, शासकीय स्तरावरील पाठपुरावा आणि कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असल्याचे सांगून आरोपीने वेळोवेळी पैसे मागितले. त्यावर विश्वास ठेवून एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२३ दरम्यान रोख, ऑनलाइन व्यवहार आणि धनादेशाद्वारे एकूण ७ लाख ३५ हजार पीडितेने त्याला दिले. मात्र वारंवार आश्वासने देऊनही कर्ज मंजूर झाले नाही.
परतफेडीसाठी दिलेले तीन चेक बाऊन्स
फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने प्रत्येकी एक लाख रुपयांचे तीन धनादेश दिले. मात्र बँकेत सादर केल्यानंतर तिन्ही धनादेश बाऊन्स झाले. संबंधित खाते बंद असल्याचेही पुढे समोर आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणात पाथरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक शिवाजी चौरे करीत आहेत.
कर्ज प्रस्तावातील खेळ उघडकीस
जानेवारी २०२४ मध्ये फिर्यादीने कर्जप्रकरणाची माहिती घेतली. तेंव्हा जून २०२२ मध्येच दीड कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर झाला होता. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन वेळा पत्रेही काढण्यात आली होती. मात्र त्या पत्रांवर फिर्यादीचा चुकीचा पत्ता नमूद करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर स्वतःचा मोबाइल क्रमांक टाकून आरोपीने ती पत्रे स्वतःकडे घेतल्याचे देखील फिर्यादी नमुद करण्यात आले आहे.