
पाटस गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; पाटस पोलीस ॲक्शन मोडवर!
पाटस : भरदिवसा गोळीबार करून गावात दहशत पसरवणाऱ्या आरोपींना यवत-पाटस पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सिमेंट वाहतुकीवरून झालेल्या गोळीबार प्रकरणातील १० अटक आरोपींची पोलिसांनी शनिवारी (दि.६) सायंकाळी पाटस पोलीस चौकी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजामाता अहिल्याबाई होळकर चौक अशी गावातून धिंड काढत जनतेसमोर आणले. त्यामुळे पाटस पोलीस आता ॲक्शन मोडवर असल्याचा संदेश गावभर गेला आहे.
गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्स समोर शुक्रवारी (दि. ५) झालेल्या गोळीबारानंतर पाटसमध्ये भयाचे वातावरण होते. यवत पोलीस आणि पाटस पोलीस चौकीने संयुक्त कारवाई करत ऊसाच्या शेतातून आणि लपून बसलेल्या ठिकाणांहून १० आरोपींना जेरबंद केले. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना हातकड्या घालून पाटसच्या मुख्य चौक, गरदडे कॉम्प्लेक्स परिसरातून धिंड काढली. भरदिवसा गोळीबार करणारे हेच लोक आहेत, असा संदेश देत पोलिसांनी जनतेचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी करून या कारवाईचे स्वागत केले.
पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. पोलिसांनी स्पष्ट केले की, “गुन्हेगारी करून कोणीही मोकाट फिरू शकत नाही. कायद्याचा धाक दाखवण्यासाठी आणि गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही धिंड काढण्यात आली. गोळीबार, दगडफेक, दहशत पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईही केली जाईल.”
तातडीच्या ॲक्शनमुळे पाटसकरांना दिलासा
या प्रकरणी एकूण १८ जणांवर गुन्हे दाखल आहेत. १० जणांना अटक झाली असून, उर्वरित ८ अनोळखी आरोपींचा शोध पोलिसांचे पथक घेत आहे. तसेच गावठी कट्टा कोणी पुरवला, श्रीगोंद्याची टोळी कोणी बोलावली, ट्रान्सपोर्ट ठेकेदाराचा यात सहभाग आहे का? याचा तपासही वेगात सुरू आहे. पोलिसांच्या या तातडीच्या ॲक्शनमुळे पाटसकरांना दिलासा मिळाला आहे. “गुन्हेगारांना मोकाट सोडले तर गावात दहशत वाढते. पोलीसांनी वेळीच कडक पाऊल उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.