
400 गुऱ्हाळे बंद, हजारो टन ऊस गाळप ठप्प; तुकाराम मुंढेंच्या कारवाईने दौंडमध्ये खळबळ
पाटस : अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या एका धडक कारवाईनं दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. भेसळयुक्त गूळ निर्मितीवर अंकुश ठेवण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर तालुक्यातील तब्बल ४०० गुऱ्हाळघरे गेल्या २ दिवसांपासून बंद आहेत. हजारो टन ऊस गाळपाअभावी वाळत पडला असून शेतकरी, गुऱ्हाळ मालक आणि कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दौंड तालुक्यात ऊस गाळप हंगाम जोरात सुरू असतानाच एफडीएची कारवाई झाली. परिणामी गाळप ठप्प झाले आहे. गुऱ्हाळांवर आणलेला ऊस आता वाळत पडला आहे. वेळेत गाळप न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. गुऱ्हाळावर अवलंबून असलेले हजारो मजूर कामाशिवाय बसले आहेत. तर भेसळीचा गूळ बंद झाल्यामुळेच हा व्यवसाय अडचणीत आला का, असा प्रश्न संपूर्ण तालुक्यात चर्चिला जातोय.
मुंढे यांची भेसळविरोधी धडक मोहीम
तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर भेसळयुक्त पदार्थांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. नकली पनीर, रंग लावलेली फळे, केमिकलयुक्त तेलानंतर आता गुळावरही त्यांचा बडगा उगारला आहे. दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळांमध्ये गुळाला पांढरा रंग यावा म्हणून युरिया, सोडा, हायड्रोस, इंडस्ट्रियल कलर यांसारखी घातक रसायने मिसळली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. तसेच साखरेची भेसळ करून गुळाचे वजन वाढवले जात होते. याच माहितीच्या आधारावर धाडी टाकताच अनेक गुऱ्हाळचालकांनी स्वतःहून गाळप बंद केले आहेत. आता खरी चर्चा ही आहे ४०० गुऱ्हाळे एकदम बंद पडणे याचा अर्थ काय?
कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत
भेसळीमुळे किडनी, लिव्हर आणि कॅन्सरचा धोका वाढतो. आरोग्य महत्त्वाचे की धंदा? भेसळ करताना सापडणाऱ्या गुऱ्हाळांवर गुन्हे दाखल, गुऱ्हाळ सील, दंडाची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत एफडीए ने दिले आहेत. बंद गुऱ्हाळांमधून सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. जे शुद्ध गूळ बनवतात. त्यांना लवकर परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची मात्र अडचण झाली आहे. साखर कारखान्यांना ऊस नेण्याचा पर्याय आहे, पण गाळपाचा दर आणि वाहतूक खर्चाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईमुळे दौंड तालुक्यात “भेसळखोरांची बैठक” घ्यावी लागते, हे सिद्ध झाले. आता दौंडचा गूळ “शुद्ध” होणार की शेतकरी अडचणीत येणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
Ans: