
फोटो सौजन्य: iStock
आहिल्यानगर येथील लोकप्रिय सराफ बाजारात अनेक वर्षांपासून विश्वास संपादन करून काम करणाऱ्या सहा बंगाली कारागिरांनी सराफ बाजारातील सोनारांना एक कोटी एक लाख पाच हजार रुपयांचा गंडा घातला आहे. दागिने बनवण्यासाठी व दुरुस्तीसाठी दिलेले सुमारे 2011 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन हे सर्व कारागीर कुटुंबासह फरार झाले आहेत. याप्रकरणी सोनार व्यावसायिक कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२. रा. गायकवाड कॉलनी, सावेडी) यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा देडगावकर यांचे सराफ बाजारात ‘जगदीश लक्ष्मण देडगावकर’ व त्यांचे भाऊ प्रतीक यांचे ‘ए जे देडगावकर’ नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या तळमजल्यावर दिपनकर माजी, सोमीन बेरा (उर्फ कार्तिक), सत्तू बेरा, स्नेहा बेरा हे कारागीर काम करत होते. तसेच, त्यांच्या दुकानासमोर विजय जगदाळे यांच्याकडे सोमनाथ सामंता व अन्मेश दुलाई हे काम करत होते.
रविवारी (दि. २६) सायंकाळी सव्वासात वाजता कृष्णा देडगावकर हे कारागीर दिपनकर माजी याच्याकडून तयार दागिने (४ गंठण, बांगड्या, राणी हार) घेण्यासाठी तळमजल्यावर गेले. मात्र, दिपनकर तेथे नव्हता. त्याला फोन केला असता, ‘दहा मिनिटांत येतो’ असे सांगून त्याने मोबाईल बंद केला. यानंतर देडगावकर यांनी सोमीन बेरा व इतरांना फोन केले सर्वांचेच मोबाईल बंद लागले. बराच्चा वेळ होऊनही कोणीच परत न आल्याने व इतर कारागिरांनी उडवाउडवीची उत्त दिल्याने देडगावकर यांना शंका आली. त्यांनी सोमनाथ सामंता याच्या रामचंद्र खुंट येथील घरी जाऊन पाहिले असता घराला कुलूप आढळले,
कोतवाली पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक असे तीन पथक या घटनेचा तपास करत आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ धार्ग यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
घटनेनंतर हे सहा मुख्य कारागीर, त्यांच्या ठेकेदाराची पत्नी व तिचा भाऊ असे एकूण 11 ते 12 जण पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. सर्वांनी संगनमत करून हा कट रचल्याचा संशय आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दिपनकर माजी, सोमीन बेरा (कार्तिक), सोमनाथ सामंता, अन्मेश दुलोई, सतु बैरा व स्नेहा बेरा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Pune News: दिवाळीत RTO ची नियमभंग करणाऱ्या १९८ बसवर धडक कारवाई; 17 लाखांपेक्षा जास्त…
या कारागिरांनी केवळ देडगावकर बंधूंचेच नव्हे, तर विजय राजाराम जगदाळे, सागर संजय गुरव, भरत दगडुशेठ शिराळकर, बरजहान सुलेमान शेख, प्रमोद आबासाहेब गाडगे, इम्रान आशरफ अली अशा एकूण आठ सोनारांचे सोने पळवले आहे. यात एकूण 2011 ग्रॅम सोन्याचे दागिने, सोने व लगड यांचा समावेश आहे.