सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी पर्वती आणि सहकारनगर परिसरात शस्त्रधारी टोळक्याने अक्षरशः धुडगूस घातल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि. १२) पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्राने तब्बल १९ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दिसेल ते वाहन फोडत टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेमुळे पहाटे झोपेत असलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
याप्रकरणी पर्वती व सहकारनगर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सोहम हरिष चौहाण (वय २०, रा. धनकवडी) याला अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी नशेत किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने वाहनांची तोडफोड केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपींच्या मागासाठी ४० सीसीटीव्ही तपासणी
युनिट दोनचे पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, पथकातील तेजश्री पवार, कुंदन शिंदे, शंकर नेवसे, योगेश मांढरे, उज्वल मोकाशी व त्यांच्या पथकाने आरोपींना पकडले. माहितीनुसार, आरोपींनी सुरुवातीला पर्वती गावठाण येथील ३ वाहनांना लक्ष्य केले. त्यानंतर हे तिघे सहकारनगरच्या दिशेने गेले. तळजाईन लेन क्रमांक तीन, तळजाई शेवटचा थांबा, स्मशानभूमी, राजमुद्रा सोसायटी व प्रिंग हिल सोसायटी परिसरात त्यांनी तब्बल १६ वाहनांची तोडफोड केली. हातातील शस्त्राने वाहनांच्या काचा आणि भागांची नासधूस करीत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. तोडफोडीच्या आवाजाने नागरिक जागे झाले आणि काहींनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सहकारनगर आणि पर्वती पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने या प्रकरणातील एका आरोपीला पकडले. तर त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. आरोपींचा माग काढण्यास परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तोडफोडीनंतर आरोपी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्याची माहितीही पोलिस तपासत आहेत.
टोळक्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई नेमकी कुठे ?
पुण्यात वाहनतोडीच्या घटना नवीन नाहीत. दहशत माजवण्यासाठी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरणारी टोळकी आणि अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग हा पोलिसांसमोरील गंभीर प्रश्न ठरत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई, हजेरी, समुपदेशन आणि सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करूनही वाहनतोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. यापूर्वी वाहनतोडी, जाळपोळ आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांवर मोक्का कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारवाईनंतरही त्याच प्रकारच्या घटना पुन्हा घडत असल्याने पोलिसांच्या प्रतिबंधात्मक यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे सुद्धा वाचा : नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?
टोळधाड कशी रोखणार ?
हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या टोळक्यांची दहशत कायम
एकाच रात्रीत १९ वाहनांची तोडफोड; नागरिकांच्या मालमतेचे नुकसान
अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील सहभाग चिंताजनक
मोक्का कारवाईनंतरही टोळक्यांचा उपद्रव थांबेना
आरोपींची हजेरी, समुपदेशन आणि ताकीदीनंतरही पुन्हा गुन्हे
टोळक्यांच्या म्होरक्यांपर्यंत पोलिस कधी पोहोचणार?
नागरिकांच्या वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?






