संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लूटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पर्वती दर्शन भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आदेश संजय काळे (वय ४१, रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमित काळे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची मुलगी घरातून निघून गेली होती. मुलीला पळून जाण्यास आरोपी आदेश काळेने मदत केल्याचा संशय महिलेला होता. याबाबत महिलेचा पुतण्या अमितने आरोपी आदेशला जाब विचारला होता. १६ जुलै रोजी त्यांच्यात वाद झाला. वादातून आदेशने अमितच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. मारहाणीत अमित गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आदेशला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक नामदे तपास करत आहेत.
लोखंडी हत्याराने सपासप वार करून तरुणाला संपवल
कानाखाली मारल्याच्या रागातून १९ वर्षीय तरुणाचा लोखंडी धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना आंबेगाव पठार भागात घडली आहे. खून करून पसार झालेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. धैर्यशील उर्फ सचिन बळीराम मोरे (२३, रा. तीन हत्ती चौक, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, खून झालेल्या तरुणाचे नाव आर्यन उर्फ निखील अशोक सावळे (१९) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धैर्यशील आणि आर्यन यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. ११ जुलै रोजी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी आर्यनने धैर्यशीलच्या कानाखाली मारले होते. त्याच रागातून आरोपीने आर्यनवर लोखंडी धारदार हत्याराने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत आर्यनला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
खून झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी धैर्यशील मोरे याचा शोध घेतला. त्यानुसार, आंबेगाव पठार येथील चिंतामणी शाळेसमोरून आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, ‘कानशिलात मारल्याचा राग मनात धरला होता,’ असे त्याने सांगितले.