
लग्न मंडपावर फेकला चक्क पेट्रोल बॉम्ब
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना आता नागपुरात एक विचित्र घटना घडली. दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरले. याच रागातून आरोपी सायमन अॅब्रो (वय २३, रा. मार्टिननगर) याने लग्न मंडपाच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकला. या प्रकाराने लग्न मंडपात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमन हा तीन वर्षांपूर्वी गोदावरीनगरात राहत होता. त्यावेळी वस्तीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणी रुबी (बदललेले नाव) च्या कुटुंबीयांशी त्याची ओळख झाली. तरुणीच्या घरी येणे-जाणे वाढले. रुबीशी त्याची घट्ट मैत्री झाली. दोघांच्या भेटी वाढल्या. त्यांच्यात मैत्री फुलत असल्याची कुणकुण कुटुंबीयांना लागली. रुबीच्या वडिलांनी सायमनची समजूत घातली. त्यामुळे दोघांची ताटातूट झाली. मात्र, काही महिन्यांनतर दोघांना एकमेकांचा विरह सहन झाला नाही. दोघे पुन्हा एकत्र आले. दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मुलीचे वाढते प्रेमसंबंध लक्षात आल्याने कुटुंबीयांनी घाईघाईने नातेवाईकातील तरुणासोबत तिचे लग्न ठरवले. घरच्यांनी रुबीवर लक्ष ठेवत तिला बाहेर जाण्याची संधी दिली नाही. लग्नाची तयारी पूर्ण झाली असतानाच ही माहिती सायमनपर्यंत पोहोचली. संतापलेल्या सायमनने दुचाकीने थेट रुबीचे घर गाठले. घरासमोर उभारलेला लग्नमंडप पाहताच त्याने शिवीगाळ करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे लग्नघरी एकच खळबळ उडाली.
पोलिसांची तत्परता; विवाह सुरळीत
घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीष कळसेकर यांनी तातडीने पथक घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी सायमनला ताब्यात घेतले. लग्न वेळेत आणि सुरळीतच होईल, असा विश्वास वधूपित्याला पोलिसांनी दिला. दुसऱ्या दिवशी रुबीचे लग्न थाटात पार पडले. नागरिकांनी पोलिसांवर दाखवलेला विश्वास मानकापूर पोलिसांनी सार्थ ठरवला.