
दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
भोकर : न्यायालयात नागरिकांचे वाद कायद्याच्या चौकटीत सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या दोन महिला वकिलांमध्येच न्यायालय परिसरात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने भोकर शहरासह न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. २४ जून २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही महिला वकिलांनी एकमेकीविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंद केले आहेत.
ॲड. सोनकांबळे आणि ॲड. राठोड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांवरून मतभेद सुरू होते. यापूर्वी काही ज्येष्ठ वकिलांनी मध्यस्थी करून दोघींमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, २४ जून रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास न्यायालयीन कामकाजादरम्यान पुन्हा दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला जाऊन झटापट आणि हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले असून, घटना घडताच न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली होती. न्यायालयीन कामासाठी आलेले पक्षकार, नागरिक आणि इतर वकील यांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना वेगळे केले. या वादामुळे काही काळ न्यायालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ॲड. सोनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत ॲड. राठोड यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून जातीवाचक शब्दांचा वापर करत अपमान केल्याचा आरोप केला आहे.
न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर
या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हाके करत असून दुसरीकडे, ॲड. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत ॲड. सोनकांबळे यांनी शिवीगाळ करून झटापट केली, हातातील पर्स हिसकावून त्यातील १,५०० रुपये काढून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सागर झाडे पुढील तपास करत आहेत.
घटनेनंतर न्यायालयीन वर्तुळात या प्रकरणाची दिवसभर चर्चा सुरू होती. काही ज्येष्ठ विधिज्ञांनी अशा घटनांमुळे वकिली व्यवसायाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे. न्याय मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘जे इतरांना कायद्याचा मार्ग दाखवतात, त्यांनीच संयम गमावणे योग्य नाही. अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ नये,’ अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.