
अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल
यवत : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत असताना, या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ३५ भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस)ने या गुन्ह्यांचे संकलन केले असून, राज्य कार्यवाह आण्णा चांदगुडे यांनी याबाबत माहिती दिली.
अनिसने जारी केलेल्या निवेदनानुसार, राज्यभर भोंदूगिरीविरोधात कारवाया वेगाने सुरू असून, ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धा, चमत्काराच्या नावाखाली फसवणूक आणि महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले जात असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या कालावधीत नाशिक, संगमनेर, मूर्तिजापूर, पेडगाव, कुर्डुवाडी, वसई, मालाड, पुणे, बारामती, ठाणे, जळगाव, पालघर, धुळे, नवी मुंबई, श्रीरामपूर, पारनेर, दिघी आदी भागांतील विविध भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनिसच्या मते, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत भोंदूगिरीची प्रकरणे समोर आली असून, विविध धर्मांतील व्यक्तींवर कारवाई झाल्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ एका धर्मापुरते मर्यादित असल्याचा दावा फोल ठरत आहे.
राज्यभरातील कारवाईत ‘हे’ प्रमुख चेहरे रडारवर
अशोक खरात (नाशिक), राजेंद्र गडगे (संगमनेर), चेतन माळी (मूर्तिजापूर), पंकज घोलप (पेडगाव), मोहन भोसले (कुर्डुवाडी), नाना बढे (आळेफाटा), ऋषिकेश वैद्य (वसई), अल्ताफ रईस खान व रिदम पांचाळ (मालाड), गणेश शिंदे (श्रीरामपूर), अर्जुन चव्हाण ऊर्फ टन-टन बाबा (नवी मुंबई), अनील सोलोमन सिंग (पुणे), पिंटू धुमाळ (बारामती), मंजुनाथ शेट्टी ऊर्फ दीक्षित (ठाणे), यशवंत थोरात (पारनेर), शाम महाराज राठोड (दिघी) यांच्यासह ३५ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.