
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! खून केला अन् मग सोनसाखळी...; कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा
सोनसाखळीसाठी खून, तिघांना जन्मठेप
३२ साक्षीदार तपासले; पुराव्यांच्या आधारे शिक्षा
दंड न भरल्यास भोगावी लागणार तीन महिन्यांची कैद
खेड: पैशाच्या हव्यासापोटी संगनमताने खून करून मयताच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करणाऱ्या तिघा आरोपींना खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा खून मंडणगड तालुक्यात ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी घडला होता. या प्रकरणी मंडणगड पोलिसांत गुन्हा क्रमांक ४७/२०१७ नोंदविण्यात आला होता. खटला सेशन केस क्रमांक ०४/२०१८ म्हणून चालविण्यात आला.
नेमकी काय घडली होती घटना ?
मयत राजाराम बाळकृष्ण चव्हाण हे चालक असून, आरोपींनी मोबाईलद्वारे त्यांना वडाप टाटा मॅजिक गाडीने टांगर येथे प्रवासी सोडण्याचे भाडे असल्याचे सांगून फसवून बोलावले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने हलला करून दगडाने मारहाण करत खून केला. त्यानंतर गळ्यातील सोनसाखळी आणि दोन मोबाईल फोन चोरून मृतदेह पुलाखालील सिमेंट पाईपमध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
दंड न भरल्यास भोगावी लागणार तीन महिन्यांची कैद
दोषी ठरलेले आरोपी म्हणजे अभिजीत सुधाकर जाधव (२७, रा. गव्हे, ता. दापोली), नरेंद्र संतीय साळवी (२८), आणि अक्षय विष्णू शिगवण (२८, रा. बॉडीवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी आहेत. जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी दिलेल्या निकालानुसार, आरोपीना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९२, ३९७, १२०(ब) व २०१ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास प्रत्येक कलमानुसार तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.
तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त
३२ साक्षीदार तपासले; पुराव्यांच्या आधारे शिक्षा
या खटल्यात सरकार पक्षाने एकूण ३२ साक्षीदार तपासले. मोबाईल लोकेशन, सीडीआर, एसडीआर, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे अहवाल, साक्षीदारावी साक्ष आणि घटनास्थळावरून मिळालेला परिस्थितीजन्य पुरावा यावरून आरोपी दोषी असल्याचे न्यायालयाने घोषित केले. सरकारी पक्षातर्फे अॅड, मृणाल जाडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल गंभीर (मंडणगड पोलीस ठाणे), कोर्ट पेरवी अधिकारी उपनिरीक्षक हरिश्चंद्र पवार आणि महिला हवालदार वैशाली सुकाळे यांनी प्रकरण उकलण्यात मोलाची भूमिका बजावली.