
एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; 'या' समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश
पिंपरी : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित गंभीर समस्यांची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण एमआयडीसीचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. सुमारे दहा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसीच्या विविध समस्यांबाबत ऑनलाइन बैठक झाली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष दौरा करून समस्यांची तीव्रता जाणून घेण्यात आली. यावेळी उद्योजक, अधिकारी आणि संबंधित विभागांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रलंबित समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
चाकण एमआयडीसी हे राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. येथे देश-विदेशातील अनेक कंपन्या कार्यरत असून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. मात्र, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, वीज आणि अन्य पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे उद्योजक, कामगार आणि स्थानिक नागरिकांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दौऱ्यादरम्यान पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी तसेच अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून परिसरातील पायाभूत सुविधांची माहिती घेण्यात आली. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, वीज, कचरा व्यवस्थापन आणि भविष्यातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित कामांची माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली.
चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर तळेगाव-चाकण-शिक्रापूर या सुमारे ५४ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील खड्ड्यांचा मुद्दाही प्रकर्षाने समोर आला. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाल्यास चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योग, हजारो कामगार आणि दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी चाकण परिसरात सुरू असलेल्या रिंग रोडच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रिंग रोड महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच चाकण एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नाला गती मिळण्याची शक्यता आहे.
पाणीटंचाईवरही तातडीने उपाय
चाकण एमआयडीसी आणि परिसरातील पाणीटंचाईची समस्याही गंभीर आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्ताराच्या तुलनेत उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा असल्याने उद्योगांसह स्थानिक नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील पुढील आठवड्यात चाकणचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. जल जीवन मिशन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यातील औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन चाकण परिसराला कायमस्वरूपी आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
कचरा आणि वीज समस्यांवरही चर्चा
चाकण एमआयडीसीतील कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवरही चर्चा झाली. औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. यासोबतच औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा, वाढत्या उद्योगांच्या गरजा आणि भविष्यातील पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. चाकण एमआयडीसीचा सातत्याने विस्तार होत असल्याने आगामी काळात पायाभूत सुविधांवरचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ सध्याच्या समस्यांवर उपाय करण्याऐवजी आगामी वर्षांतील औद्योगिक विकास लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे दीर्घकालीन नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
आता निर्णयांच्या अंमलबजावणीची अपेक्षा
चाकण एमआयडीसीच्या विविध समस्यांबाबत यापूर्वीही अनेक बैठका आणि आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्ष कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याची उद्योजकांची तक्रार आहे. त्यामुळे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष दौरा करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने उद्योजकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रस्ते, पाणी, कचरा, वीज आणि वाहतूक यांसारख्या प्रमुख समस्यांवर ठोस आणि कालबद्ध कार्यवाही झाल्यास चाकणच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे या दौऱ्यानंतर हा विषय केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊन ती निर्धारित कालमर्यादेत पूर्ण व्हावीत, हीच उद्योजक आणि नागरिकांची प्रमुख अपेक्षा आहे.