मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
जमीर खलफे, रत्नागिरी: मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. टोळीतील चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीला आले आहेत. तसेच त्यांच्याकडून ६,२७,००० हजार किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरीचे अनेक प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु होते. याबाबत पुर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी तात्काळ एक पथक तयार करुन सदर पथकाला मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या.
सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहीतीचे आधारे राहुल कुंदन तोडणकर ( वय-29, रा. शिवलकरवाडी, आलावा जाकिमिऱ्या रत्नागिरी ) शुभम निलेश खडपे (वय-24, रा. गोडावुन स्टॉप नाचणे ता. जि.रत्नागिरी) मुस्तफा गुड्डु पठाण (वय 22, रा. गोडावुन स्टॉप नाचणे, रत्नागिरी) विकास महेश सुतार (वय-19, रा. थिबा पॅलेस गार्डनचे बाजुला, रत्नागिरी) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता नमुद आरोपीत यांनी पावस व रत्नागिरी या परिसरामध्ये विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीत यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करणेकामी वापरलेली वाहने व साहीत्य असा एकूण 6 लाख 27,000 हजार किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपी यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करणेकामी वापरलेली वाहने व साहीत्य असा एकूण ६ लाख २७०० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या चोरट्यां कडून एकूण पाच ठिकाणंचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
याआधी पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि पश्चिमेकडील अनेक भागात मोबाईल टॉवरमधून रेडिओ रिसीव्हर युनिट्स, बॅटरी आणि इतर मौल्यवान उपकरणे चोरी झाल्याचे समोर आले. या आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आले असून मुख्य आरोपी शाहरुख मलिकने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने बीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण सोडले आणि बिर्याणीचे दुकान चालवण्यास सुरुवात केली. पण जास्त पैसे कमवण्याच्या लोभापायी त्याने वडील आणि भाऊ नईमसोबत भंगार व्यवसाय सुरू केला. नंतर नईम जावेद मिरापुरियाच्या संपर्कात आला, जो मोबाईल टॉवर्समधून चोरीला जाणारी उपकरणे खरेदी-विक्री करायचा.