
मसूर-उंब्रज रस्त्यावर भीषण अपघात
मसूर : निकृष्ट दर्जाच्या व जीवघेण्या खड्ड्यांनी भरलेल्या मसूर-उंब्रज काम सुरू असलेल्या रस्त्याने अखेर एका महिलेचा बळी घेतला. मसूर पोस्ट ऑफिससमोर खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव बोलेरोने महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर सात महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी दुपारी घडला.
या अपघातात रेशमा रमजान मुजावर (वय ५३, रा. खडकपेठ, मसूर) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत. सदर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अनिल मोहन कुराडे (रा. उंब्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची नोंद उशिरापर्यंत मसूर पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.
हेदेखील वाचा : Jalna Road Accident : जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरीसाठी गेलेल्या महिलांसह 8 जणांना ट्रकने चिरडलं
सध्या मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. ठेकेदाराने अनेक ठिकाणी खड्डे तसेच ठेवले आहेत. मसूर-उंब्रज रस्त्यावर पोस्ट ऑफिस समोर खड्डा चुकवण्याच्या नादात बोलेरो (एमएच ०४ एफ के २९४६) ही शेतमजुरीसाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या ॲपे रिक्षा (एमएच ११ एल ८२९७) ला समोरून उजव्या बाजूने जोराची धडक दिल्याने ॲपे रिक्षातील रेश्मा रमजान मुजावर (वय 48) ही महिला जागीच ठार झाली.
जिजाबाई रघुनाथ जाधव, शाहीदा सिकंदर शेख, अलका सदाशिव जाधव, सविता मारुती शिरतोडे, मंगल दिलीप जाधव, पाकीजा फिरोज शेख, ज्योती नितीन जाधव सर्व रा. मसूर या सात महिला अपघातात गंभीर जखमी जखमी झाल्या.
रस्ता की मृत्यूचा सापळा
मसूर पोस्ट ऑफिससमोरील रस्ता पूर्णपणे उखडलेला, खड्डेमय झाला आहे. वाहनचालकांना अचानक खड्डा समजत नाही. परिणामी, येथे वारंवार अपघात होत आहेत. आज त्याच निष्काळजीपणाने एका महिलेचा बळी घेतला. रस्ता की मृत्यूचा सापळा? असा मोठा प्रश्न आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अधिकारी, ठेकेदारांनी डोळेझाक केली. त्यात आज एका महिलेला जीव गमवावा लागला, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
पोलिस ठाण्यावर संतप्तांचा हल्लाबोल
अपघातानंतर संतप्त नागरिक, मुस्लिम बांधव व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने मसूर पोलीस ठाण्यावर धडकले. पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरा. बोलेरो चालकावर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी करत, कारवाई झाली नाही तर मृतदेह पोलीस ठाण्यासमोरच दफन करू, असा इशाराही देण्यात आला. त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गांभीर्यता पाहता दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.