फोटो सौजन्य - सोशल मिडीया
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिक सोमवारी रात्री क्वालालंपूरला जाण्यासाठी घरातून निघाला होता. त्याने कुटुंबीयांना ही व्यावसायिक कामासाठीची ट्रिप असल्याचे सांगितले होते. दोन मित्रांनी त्याला मुंबई विमानतळावर सोडले. मात्र, प्रत्यक्षात त्याने एका महिला मैत्रिणीसोबत मलेशियाला जाण्याचे नियोजन केले होते. दोघेही विमानतळावर पोहोचल्यानंतर इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान या प्रवासाला अचानक ब्रेक लागला.
हेही वाचा: Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
महिला मैत्रिणीकडे जुना पासपोर्ट असल्याचे इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळले. त्यामुळे तिला पुढील प्रवासाची परवानगी मिळाली नाही. मैत्रिणीला मलेशियाला जाता येणार नसल्याने व्यावसायिकानेही आपला प्रवास रद्द केल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर दोघे विमानतळाबाहेर पडले आणि सीएसटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेले. याचदरम्यान व्यावसायिकाने आपला मोबाईल फोन बंद केला.
विमानतळावर असताना त्याने एका लँडलाईनवरून पत्नीशी संपर्क साधला होता. इमिग्रेशनच्या समस्येमुळे त्याचा मोबाईल जमा करण्यात आल्याचे त्याने पत्नीला सांगितले. त्यानंतर दुपारी ३.३५ वाजता त्याने पत्नीला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला आणि समस्या लवकरच सुटेल, असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. मित्रांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.
पतीचा ठावठिकाणा लागत नसल्याने पत्नीने सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या बेपत्ता होण्याचा तपास सुरू केला. दरम्यान, बुधवारी रात्री हा व्यावसायिक स्वतःहून सहार पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना विमानतळावर घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. मलेशिया दौरा रद्द झाल्यानंतर तो महिला मैत्रिणीसोबत सीएसटीच्या दिशेने गेला होता आणि त्याने फोन बंद केला होता, असे त्याने सांगितले. या प्रकारामुळे सुरुवातीला अपहरणाचा संशय निर्माण झाला असला तरी व्यावसायिक स्वतःहून परतल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांकडून या संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी सुरू आहे.






