इंडोनेशियात भीषण दुर्घटना! २४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज जावा समुद्रात बेपत्ता; बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध सुरू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
इंडोनेशियाच्या (Indonesia Ship Missing) सागरी हद्दीतून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. पूर्व जावाहून बोर्नियो बेटावरील दक्षिण कालीमंतन प्रांताकडे प्रवास करणारे एक मोठे प्रवासी जहाज जावा समुद्राच्या मध्यभागी अचानक बेपत्ता झाले आहे. या जहाजावर २४० हून अधिक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा सवार होता. जहाजाशी अचानक संपर्क तुटल्याची बातमी समोर येताच इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेने (BASARNAS) जावा समुद्रात हाय अलर्ट जारी करून तातडीने महाकाय शोधमोहीम हाती घेतली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ‘व्हार्गो ट्रान्सपोर्ट ८’ (Virgo Transport 8) नावाचे हे प्रवासी जहाज पूर्व जावा प्रांतातील इंडोनेशियाचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या सुराबाया येथून दक्षिण कालीमंतनची राजधानी बंजरमासिनकडे रवाना झाले होते. प्रवासादरम्यान जावा समुद्रात बंजरमासिन येथील बंदरापासून अंदाजे १४८ किलोमीटर (९२ मैल) अंतरावर असताना जहाजाच्या रेडिओ सिस्टीम आणि संपर्क यंत्रणेशी झालेला शेवटचा संपर्क तुटला. त्यानंतर जहाजाकडून कोणताही संदेश किंवा सिग्नल प्राप्त झालेला नाही.
दक्षिण कालीमंतन प्रांतातील बंजरमासिन येथील शोध आणि बचाव कार्यालयाला जहाजाच्या चालकांकडून आणि सागरी वाहतूक नियंत्रकांकडून संपर्क तुटल्याची अधिकृत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बचाव पथके रवाना केली. जहाजाचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाच्या विशेष नौका, बचाव विमाने आणि स्थानिक सागरी पथकांना घटनास्थळाच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 9/11 Attacks: अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या फाईलमधून नवीन खुलासे; वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यापूर्वीच भारत होता बिन लादेनचा निशाणा
जावा समुद्रातील हवामानाची बिकट स्थिती, समुद्रातील उंच लाटा आणि तांत्रिक बिघाड यामुळे जहाजाचा संपर्क तुटला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. जहाजावरील २४० प्रवाशांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या नातेवाईकांमध्ये अत्यंत भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बचाव अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता उपलब्ध सर्व संसाधनांचा वापर करून शोध मोहीम वेगाने राबवली जात आहे.
BREAKING: At least 125 people are missing after the passenger ship Virgo Transport 8 lost contact in the Java Sea near South Kalimantan, Indonesia. Authorities have rescued 115 people, while 1 person has been confirmed dead. Search and rescue operations are ongoing. pic.twitter.com/urIUSJQ0e7 — Weather Monitor (@WeatherMonitors) September 13, 2026
credit – social media and Twitter
इंडोनेशियातील या घटनेच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी शेजारील फिलीपिन्स देशामध्येही एक भीषण सागरी अपघात घडला होता. १० सप्टेंबर रोजी फिलीपिन्समधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ पलावान जवळ एका प्रवासी फेरीला अचानक भीषण आग लागली होती. मनिलाहून कोरोनच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ‘एम/व्ही जून एस्टर’ (M/V June Aster) नावाच्या फेरीला किनाऱ्याजवळ पोहोचण्यापूर्वीच आगीने वेढले.
त्या दुर्घटनेत फेरीवर एकूण १३४ लोक सवार होते. आगीच्या ज्वाळा पसरल्यानंतर फिलीपिन्स तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्य राबवून ४३ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते. मात्र, त्या दुर्घटनेत किमान ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर ८७ हून अधिक प्रवासी आजही बेपत्ता आहेत. आशियाई सागरी क्षेत्रात लागोपाठ घडणाऱ्या अशा अपघातांमुळे सागरी वाहतुकीच्या सुरक्षेवर आणि तांत्रिक मानकांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India UAE Trade: ‘संरक्षण, AI, अवकाश, महत्त्वपूर्ण खनिजे…’; भारत आणि युएईमध्ये 11.5 अब्ज डॉलर्सच्या महागुंतवणुकीचा मार्ग मोकळा
इंडोनेशिया हा सुमारे १७ हजार लहान-मोठ्या बेटांचा बनलेला देश असल्याने येथे एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी जलवाहतूक आणि प्रवासी फेऱ्या हा अत्यंत महत्त्वाचा व स्वस्त पर्याय मानला जातो. मात्र, वारंवार होणारे हवामानातील बदल आणि जहाजांची क्षमता संपल्यानंतरही होणारी वाहतूक यामुळे जावा समुद्रात अपघातांचे प्रमाण मोठे असते. सध्या बेपत्ता झालेल्या ‘व्हार्गो ट्रान्सपोर्ट ८’ जहाजाचा शोध घेण्यासाठी इंडोनेशियाचे नौदल आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक रात्रंदिवस प्रयत्न करत आहे.






