
पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्...
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खूनाचा डाव उधळून लावत एका पिस्तूलधारी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे केलेल्या तपासानंतर त्याला तब्बल आठ जणांनी एकाची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल तसेच जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय २६, रा. दांडेकर पूल, शंकर पवार यांच्या घराजवळ, सिंहगड रोड) या पिस्तूलधारी तरुणाला अटक केली आहे.
तसेच याप्रकरणात सुपारी देणाऱ्या सिंधू धोत्रे उर्फ आक्का, अमन झरेकर याची आई सिन्नू झरेकर, गणेश रेणुसे याची आई पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर (सर्व रा. महालक्ष्मी बिल्डिंग, सिंहगड रस्ता, दत्तवाडी), सुमित माने (रा. हडपसर), निशांत राऊत (रा. अपर बिबवेवाडी) आणि बापू कांबळे (रा. अपर बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अमर आनंदराव पवार यांनी पर्वती पोलिसांत तक्रार दिली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, सहायक उपनिरीक्षक रणजित फडतरे, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, दयानंद तेलंगे पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
पेट्रोलिंग करताना खंडणी विरोधी पथकाची कारवाई
दोन दिवसांपुर्वी (दि. १७ फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास खंडणी विरोधी पथक एकचे पथक पेट्रोलिंग करत होते. तेव्हा गांजवे चौकात पोलिस हवालदार सचिन माळवे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दांडेकर पूल येथे गणेश रेणुसे, सुमित माने, निशांत राऊत, अमन झरेकर तसेच इतरांनी टोळी तयार करून एकाचा खून करण्याचा कट रचला आहे. त्याचाच भाग म्हणून एक पिस्तुल आणून ते बाळ्या नावाच्या सराईत गुन्हेगाराला दिले आहे. दरम्यान, बाळ्या नावाची व्यक्ती दांडेकर पूल भागात फिरत असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या कमरेला पिस्तुल खोचलेले आढळले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो सध्या दांडेकर पूल येथे राहत असून मूळचा भांबेवाडी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील असल्याचे सांगितले. पिस्तुलाबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. अधिक चौकशीत त्याने सिंधू धोत्रे उर्फ आक्का, सिन्नू झरेकर, पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर, सुमित माने, निशांत राऊत व बापू कांबळे यांनी एकत्र २०२५ मध्ये पिस्तुल विकत आणल्याचे समजले. हे पिस्तुल त्यांनी संतोष उर्फ भावड्या साळुंखे याचा खून करण्यासाठी विकत आणले होते. ते बाळ्याला सुमित माने याच्या मार्फत देण्यात आले होते.
…म्हणूनच रचला खुनाचा कट
गणेश रेणुसे व संतोष साळुंखे यांच्यात २०२४ मध्ये भांडणे झाली होती. त्या भांडणात संतोष साळुंखे याला कोयत्याने मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा बदला संतोष साळुंखे घेणार असल्याची माहिती सिंधू धोत्रे उर्फ आक्का यांच्यासह इतरांना होती. मात्र, संतोष साळुंखे याच्याकडून काही हालचाली होण्यापूर्वीच त्यांनी साळुंखेच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी ३५ हजार रुपयांत पिस्तुल विकत आणले. ते बाळ्याच्या ताब्यात देण्यात आले. या सुपारीचे पैसे त्याला काम झाल्यानंतर देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, वेळीच पोलिसांनी कारवाई करून आरोपी टोळीचा डाव हाणून पाडला.