संग्रहित फोटो
आकाश नवनीत सावंत, समीर अतिक अन्सारी आणि शेख शौकत अतिक अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही शहर वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. याबाबत कोरेगाव पार्क येथील ४६ वर्षीय व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २० जून रोजी फिर्यादी यांनी त्यांची कार कोरेगाव पार्कमधील नो-पार्किंगमध्ये उभी केली होती. टोइंग व्हॅनवरील चालकासह दोन कर्मचाऱ्यांनी कार उचलून वाहतूक विभागाच्या कार्यालयात नेली. कार सोडवण्यासाठी फिर्यादी तेथे गेले असता, त्यांच्या वाहनाचे दिव-दमन येथील आरटीओ पासिंग असल्याचे तसेच महाराष्ट्रात त्याची नोंदणी नसल्याचे आणि पीयूसीची मुदत संपल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली. या कारवाईचा धाक दाखवत आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांचा दंड मागितला.
भिलारे यांनी रीतसर पावतीची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी तडजोडीचा सूर लावत कार सोडण्यासाठी तीन हजार रुपये मागितले. भिलारे यांनी पैसे दिल्यानंतर पावती मागितली असता, ‘नंतर येऊन पावती घेऊन जा’ असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. तीन हजार रुपये दिल्यानंतरही पावती न मिळाल्याने तक्रारदार गेल्या दोन महिन्यांपासून पावतीसाठी पाठपुरावा करीत होते. मात्र, टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक वेळी टाळाटाळ करण्यात आली. अखेर संशय बळावल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वरिष्ठांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने तपास हाती घेतला आणि तिन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक केली. खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
हे सुद्धा वाचा : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या






