
धक्कादायक ! आयटी कंपनीतच धर्मांतरण; अत्याचाराचे नऊ गुन्हे दाखल
नाशिक : एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ तरुणींसोबत जवळीक साधून एकीवर अत्याचार तिच्यासह एका तरुणाचे बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना इंदिरानगर परिसरातील आयटी पार्कमधील कंपनीत झाली. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांसह कंपनीच्या एचआर असलेल्या महिलेलाही आरोपी केले असून, राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच अशाप्रकारे बहुराष्ट्रीय कंपनीतील गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
याप्रकरणी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलिसांत आठ व देवळाली कॅम्प पोलिसांत एक असे नऊ गुन्हे याप्रकरणी दाखल आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. एका धर्मातील सातपैकी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना दहा एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या माहितीनुसार, आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख आणि निदा खान अशी संशयितांची नावे आहेत. त्यापैकी निदा हिचा शोध सुरू आहे.
एका पीडितेची अत्याचार व धर्मांतरणाच्या प्रयत्नाची तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंदवून ‘एसआयटी’ स्थापन झाली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत संशयितांना ताब्यात घेत पीडितांना विश्वासात घेतले. त्यानुसार आतापर्यंत नऊ गुन्हे नोंद असून, आणखी पीडिता समोर येण्याची शक्यता आहे.
‘धर्मसंस्कृती’ रुजवण्याचा प्रयत्न
संशयित आठवड्यातून एकदा विशिष्ट प्रकारचे अत्तर लावून कार्यालयात यायचे. धार्मिक पारंपरिक पठाणी कपडे परिधान करून डोळ्यांत सुरमा भरून एका विशिष्ट बोलीभाषेचा वापर करून सर्वांशी संवाद साधायचे. त्यातून काही पीडितांना धर्मावरून शेरेबाजी करत स्वतः ची धर्मसंस्कृती रूजविण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात पीडितांच्या जबाबातून समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
बारा जणांची ‘एसआयटी’
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, देवळाली कॅम्पचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, मुंबई नावयाचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे, सुधीर पाटील, कल्पेश दाभाडे, जितेंद्र वाघ, उमेश बोरसे, पोलिस उपनिरीक्षक भाईदास माळी, किरण शेवाळे, मिताली कोळी, अंमलदार संदीप बागल या बारा जणांची एसआयटी नेमण्यात आले आहे.
कंपनीत दोनशे कर्मचारी कामाला
या कंपनीत जवळपास २०० कर्मचारी काम करतात. सर्व पीडिता पदवीधर, उच्च पदवीधर असून, त्यांना फारतर १८ ते २२ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. या घटनेतील एका युवतीने एचआरकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, खासगी कंपनीत असे प्रकार घडतात, असे सांगत महिला एचआरने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. यामुळे आरोपींचे धाडस वाढले. तसेच कॉर्पोरेट असलेल्या या कंपन्यामधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी विशाखा प्रमाणे एखादी समिती कार्यरत होती का नव्हती, हा सुद्धा प्रश्न आहे.
धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; मासिक पाळीच्या काळातही जबरदस्ती केली अन्…