
पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?
नांदेड : किनवट येथील शासकीय विश्रामगृहात कार्यरत ४३ वर्षीय आदिवासी महिला कर्मचाऱ्याचा सलग दोन दिवस विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पहिल्या दिवशी अश्लील मागणी आणि जातीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा, तर दुसऱ्या दिवशी महिलेचा हात पकडून तिच्याशी जबरदस्तीची ओढाओढ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता तिला दिवसभर ताटकळत ठेवण्यात आले. मात्र, पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी हा आरोप फेटाळून लावत तक्रार प्राप्त झाल्याच्या दिवशी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित महिला आंध आदिवासी समाजातील असून ती गोकुंदा व किनवट येथील शासकीय विश्रामगृहात स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहे. २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी बालाजी केंद्रे (रा. कोपरा, ता. किनवट) हा विश्रामगृहातील किचनमध्ये गेला. त्याने महिलेचा एकटेपणाचा फायदा घेत अश्लील मागणी केली तसेच तिच्या जातीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
विश्रामगृहाच्या किचनमध्ये महिलेचा विनयभंग महिलेने आरडाओरड केल्यानंतर विश्रामगृहाचे व्यवस्थापक वैभव बिराजदार यांनी तेथे धाव घेऊन आरोपीला बाहेर काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी पुन्हा किचनमध्ये गेला. त्याने महिलेचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याशी ओढाओढ केल्याचा आरोप आहे. महिलेच्या आरडाओरडीनंतर व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून आरोपीला बाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्याशी प्रश्नोत्तर
प्रश्न: २१ तारखेला पीडित महिला फिर्याद देण्यासाठी आली होती, पण तिची फिर्याद घेण्यात आली नाही, हे खरे आहे काय?
गणेश कराड : ज्या दिवशी महिला तक्रार द्यायला आली, त्याच दिवशी गुन्हा दाखल केला. आरोपीही ताब्यात घेतला आहे.
प्रश्न : महिलेला पोलिस ठाण्यात ताटकळत ठेवले, हे खरे आहे काय?
गणेश कराड : तसा काही प्रकार नाही. आरोपी ताब्यात आहे. BNS कलम ७४, ७५ (२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.