संग्रहित फोटो
नांदेड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. धनेगाव येथील पेट्रोल पंपावर झालेल्या इंदरजितसिंघ बलजितसिंघ बावरी यांच्या खून प्रकरणातील सहावा फरार आरोपी अजय ऊर्फ अज्जू महेंद्र बिगानिया (वय ३२, रा. वाल्मिकी नगर, देगलूर नाका, नांदेड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गोवर्धन घाट परिसरात सापळा रचून ११ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
८ ऑगस्ट रोजी इंदरजितसिंघ बावरी हे मित्रासोबत धनेगाव येथील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरावासावी गेले होते. यावेळी पूर्वीच्या बिगानिया, किन्ना परदेशी व त्यांच्या साथीदारांनी कट रचून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खंजराने वार झाल्याने बावरी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिगानियाच्या अटकेने खून प्रकरणाला नवे वळण
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार फरार आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक कार्यरत होते. ११ ऑगस्ट रोजी वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन घाट परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अजय बिगानियाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक झाली असून, अजय बिगानियाच्या अटकेमुळे अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे.
हे सुद्धा वाचा : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तब्बल 10.74 कोटींची ‘अशी’ झाली फसवणूक
पुण्यात तरुणाचा खून
पुण्याचा मध्यभाग असलेल्या गणेश पेठ परिसरात वडापाव खरेदीसाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश पेठेतील डुल्या मारूती चौक परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





