
व्यावासयिक विशाल अगरवालच्या अडचणीत वाढ? जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ‘कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावासयिक विशाल अगरवाल याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज केला जाणार आहे. पुणे पोलिसांकडून २३ जून रोजी याबाबत सत्र न्यायालायात अर्ज दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाकडून अगरवाल याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर समाज माध्यमात अगरवाल आणि कुटुंबीय जल्लोष करतानाची कथित चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. ‘पुणे पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन अगरवाल याचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी तयारी सुरू केली आहे. २३ जून रोजी न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाची परवानगी मिळवण्यात आली आहे’, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अगरवाल याच्या अल्पवयीन मुलासह मित्रांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अगरवाल आणि साथीदारांनी ससूनमधील डाॅक्टरांशी संगनमत केले होते. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर विशाल अगरवाल याला अटक केली होती. त्याचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर अगरवालने सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
सर्वोच्च न्यायालायने कठोर अटी, शर्तींवर अगरवालचा जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर अगरवाल याची कुटुंबीयांसोबत जल्लोष करताना कथित चित्रफीत प्रसारित झाली होती. समाज माध्यमात ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले होते. जबाब आणि डिजिटल पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अगरवाल याला घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्याची माहिती न्यायालयात दिली जाणार आहे.
हे सुद्धा वाचा : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, अंतिम युक्तिवाद पुर्ण; पुढील आठवड्यात…
पोलिसांचे म्हणणे काय ?
विशाल अगरवाल याने संबंधित चित्रफीत २०२३ मधील असल्याचा दावा केला होता. जामीन मिलाल्यानंतर जल्लोष केला नाही, असे अगरवाल याने सांगितले होते. मात्र, पोलिसंनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. जामीन मिळाल्यानंतर जल्लोषाची चित्रफीत ही समाज माध्यमातील स्टेटसवर ठेवणे ही बाब मृतांच्या कुटुंबीयांची भावना दुखावणारी आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.