crime (फोटो सौजन्य : social media )
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही म्हणून सासू आणि नणंदेकडून छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली. राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील किनोद गावात ही घटना घडली आहे. महिलेचा संशयास्पद मृत्य झाल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्या आल्याने महिलेच्या भावाने तिच्या सासू आणि नणंद यांच्यावर गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे.
मित्राच्या वाढदिवसाची पार्टी बेतली जीवावर; जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू
मृत महिलेचे नाव गायत्री कोळी असे आहे. गेल्या काही महिन्यांपासून महिलेच्या माहेरून पैश्याची मागणी केली जात होती. तसेच किरकोळ कारणांवरून तिला सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता असा आरोप केला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांनी केलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पैश्याच्या त्रासातून मानसिक त्रास दिला जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.
महिलेच्या मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर विवाहितेच्या माहेरच्यांनी तडक किनोद येथे धाव घेतली. बहिणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याचे कळताच विवाहितेचा भाऊ आणि मावशी दोघांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला आहे. महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्याने सासू आणि नणंद या दोघीनी गाला दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या भावाने आणि मावशीने केला आहे.
सासरच्यांकडून गायत्रीचा छळ
गायत्रीच्या भावाने म्हणजेच सागर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून माहेरून पैसे आणण्यावरून सासरी गायत्रीचा छळ होत होता. किरकोळ कारणांवरून शिवीगाळ,मारहाण केली जात होती.मासिक पाळी असल्याने सासरचे लोक तिने केलेला स्वयंपाक ही खात नसल्याने आपल्या बहिणीने मासिक पाळी सुरू असल्याने स्वयंपाक केला नव्हता. या कारणावरून सासू आणि नणंद या दोघींनी बहिणीला शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याने तसेच मारहाण केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घटनेनंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मृत गायत्री कोळी हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.