
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; 'या' भागात सापळा रचून पकडले
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे तसेच उपनिरक्षक संजय
नरळे, पोलिस अंमलदार अमोल सुतकर तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरातील पाहिजे व फरार असलेल्या आरोपींची माहिती काढून त्यांना जेरबंद केले जात आहेत. दरम्यान, वारजे माळवाडी पोलिस त्यांच्याकडे असलेल्या मोक्कातील पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना उपनिरीक्षक संजय नरळे यांना अमोल लाखे याच्याबाबत माहिती मिळाली. तो बार्शी शहरात राहत असल्याचे समजले. त्यानूसार, पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्याने गुन्ह्यातील सहभाग मान्य केला.
निलेश घायवळ टोळीचा इतिहास
कोथरूडच्या गर्द हिरवाईत, शिक्षणसंस्था आणि ‘उच्चभ्रू’ वसाहतींच्या शांत कुशीत गुन्हेगारीचे रोप कसे रुजले ? असा प्रश्न गजा मारणे टोळीच्या उदयानंतर समोर येतो. पण, याच उच्चभ्रू व उच्चशिक्षीत तसेच जिथून विद्-वत्ता घडावी अशा परिसरातून उच्चशिक्षण घेणारा निलेश घायवळ नावाचा तरूण गुन्हेगारीकडे वळला आणि त्याची दुसरी टोळी तयार झाली. फक्त, कोथरूड, पुणे शहर मर्यादित न राहता त्याच्या टोळीचे हात जामखेड, धाराशिव, पौड, मुळशी, अहमदनगर अशा भागांमध्ये पसरले. निलेश घायवळला गुन्हेगारीत ‘बॉस’ नावाने ओळखले जाते. एकाच भागातील असल्याने गजानन मारणे, रूपेश मारणे व संतोष शेलार यांच्याशी त्याची मैत्री होती. पण, त्यांच्यासोबतच तो १९९९ पासून गुन्हेगारीत शिरला. दोन खूनाच्या गुन्ह्यात निलेशचा प्रत्यक्ष सहभाग होता. एकाच टोळीचा भाग असलेले गजा मारणे व निलेश यांच्यात वर्चस्व, मनात असलेला मी पणा, आर्थिक उलाढाल, पैसा आणि इतर कारणांनी या दोघांत वाद झाले आणि एकाच भागात दोन टोळ्या निर्माण झाल्या.