धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर...
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता वर्ध्याच्या आर्वी येथील रहिवासी असलेल्या शेख शाहरुख शेख रऊफ याची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
आर्वी येथील शेख शाहरूख याची हत्या झाली. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी नियोजनबद्ध कट रचून हत्या करण्यात आली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुणालाही या घटनेची माहिती मिळू नये, या हेतूने अमरावती जिल्ह्यात मृतदेह नेत जाळून पुरावेही नष्ट केले. याप्रकरणी अमरावती जिल्ह्याच्या पथ्रोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
आर्वी शहरातील रहिवासी शेख शाहरुख शेख रऊफ याने काही दिवसांपूर्वी आर्वीतीलच रहिवासी प्रशांत महाजन याच्याशी वाद केला होता. याची माहिती प्रशांत महाजन याचा मुलगा टिंकेश महाजन व टिंकेशचा आतेभाऊ शुभम मोहनलाल रॉय याला मिळाल्यावर शेख शाहरुख शेख रऊफ याला जीवानिशी ठार करण्यासाठी नियोजनबद्ध कट रचण्यात आला. त्यानंतर अली अजगर सब्दर हुसेन याने पैशाचे आमिष देत प्रकरण आपसात मिटवू असे सांगत शेख शाहरुख याला गावाबाहेर आणले. त्यानंतर टिंकेश व अली अजगर यांनी शेख शाहरूख यास मारहाण करून हत्या केली. त्याचा मृतदेह टिंकेशने आणलेल्या चारचाकी वाहनात टाकून आरोपी आर्वी येथून निघून गेले.
नंतर शुभम रॉय याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अमरावती येथे बोलावण्यात आले. त्यानेही तीन साथीदारांना घेत लेहगाव गाठले. त्यानंतर शेख शाहरूख याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्याच्या शहानूर धरणाच्या कालव्यात जाळून तेथून पोबारा केल्याची कबुली आरोपींनी दिली.
सहा जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून टिंकेश महाजन (रा. आर्वी), प्रशांत महाजन (रा. आर्वी), अली अजगर सब्दर हुसेन (रा. आर्वी), हर्षित प्रकाश गौर (रा. अंजनगाव सुर्जी) व निखिल दीपचंद गौर (रा. अंजनगाव सुर्जी) व एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक कार, सात मोबाईल जप्त केले आहे.
हेदेखील वाचा : मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध






