
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत आशय, तंत्रज्ञान आणि सादरीकरणाच्या बाबतीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता या बदलांना आणखी वेग देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे. ‘द फर्स्ट मराठी युनिव्हर्स’ ही संकल्पना प्रेक्षकांसमोर यशस्वीपणे मांडणाऱ्या ‘घबाडकुंड’ चित्रपटानंतर आता मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय साकारण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी तब्बल ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा निर्माते डॉ. रसिक कदम यांनी केली आहे.
‘घबाडकुंड’ने मराठी सिनेमात एक वेगळी दिशा निर्माण केली. स्वतंत्र कथानकांच्या पलीकडे जाऊन परस्परांशी जोडलेल्या कथाविश्वाची संकल्पना मराठी प्रेक्षकांनी स्वीकारल्याने निर्मात्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. याच यशाच्या जोरावर आता अधिक मोठ्या प्रमाणात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह दुसरा अध्याय साकारला जाणार आहे.
निर्माते डॉ. रसिक कदम यांच्या मते, मराठी चित्रपटसृष्टीला केवळ यशस्वी चित्रपट नव्हे, तर दीर्घकालीन सिनेमॅटिक फ्रँचायझींची गरज आहे. जागतिक स्तरावरील चित्रपटविश्वाप्रमाणे मराठीतही एक भक्कम आणि सातत्यपूर्ण युनिव्हर्स उभं करण्याचं ध्येय या प्रकल्पामागे आहे. ५० कोटी रुपयांची गुंतवणूक ही केवळ आर्थिक बाब नसून मराठी सिनेमाच्या भविष्यातील शक्यतांवर ठेवलेला विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.
या नव्या अध्यायात नेमकं काय पाहायला मिळणार, कोणते कलाकार झळकणार आणि कथानकाची दिशा काय असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षकांना यावेळी अधिक व्यापक, रोमांचक आणि जागतिक दर्जाचा सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने उभारला जाणारा हा प्रकल्प आगामी काळात उद्योगक्षेत्रासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. ‘घबाडकुंड’ने सुरू केलेला प्रवास आता अधिक मोठ्या कॅनव्हासवर पोहोचणार असून, मराठी युनिव्हर्सचा हा दुसरा अध्याय सिनेसृष्टीसाठी नवा मैलाचा दगड ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.