
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी मनोरंजन विश्वात सध्या मालिकांच्या बदलत्या वेळापत्रकाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही महिन्यांत तब्बल ८ नवीन मालिका आणि शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहिनीवरील काही जुन्या आणि लोकप्रिय मालिकांना निरोप द्यावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता ‘मुरांबा’ ही लोकप्रिय मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तब्बल ४ वर्षे आणि जवळपास १४०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्यानंतर ही मालिका ऑफ एअर होणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
14 फेब्रुवारी 2022 रोजी मुरांबा या मालिकेचा पहिला भाग स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झाला होता. या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेत या दोघांनी रमा आणि अक्षय हे पात्र साकारले होते. नुकतेच या मालिकेचे 1400 भाग पूर्ण झाले. चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेचा प्रवास आता शेवटाकडे येऊन पोहोचला आहे. सर्वांची लाडकी मुरांबा मालिका लवकरच निरोप घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
अभिनेत्री शिवानी मुंढेकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तिने one last time.. रमा म्हणून काही शेवटचे क्षण असं कॅप्शन लिहिले आहे. यावरून मुरांबा मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, ‘मुरांबा’ ही मालिका पहिल्या दिवसापासून ‘प्रवाह दुपार’ या सत्रात प्रसारित केली जात होती. दुपारच्या स्लॉटमध्ये सातत्याने उत्तम प्रतिसाद मिळवत ही मालिका त्या सत्रातील सर्वाधिक यशस्वी मालिका ठरली. कथानकातील भावनिक वळणं, कौटुंबिक नातेसंबंध आणि कलाकारांच्या अभिनयामुळे मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची वेळ बदलल्यानंतर सध्या ‘मुरांबा’ दुपारी ३ वाजता प्रसारित होत आहे. मात्र, आता या मालिकेचा प्रवास लवकरच संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने सोशल मीडियावर “One Last…” अशी पोस्ट शेअर केल्याने या चर्चेला आणखी उधाण आले आहे. अशातच ‘मुरांबा’च्या शेवटाची बातमी चाहत्यांसाठी भावनिक ठरत असून, मालिकेचा अंतिम भाग कधी प्रसारित होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.