( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
झी5 वरील ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रेम, करिअर आणि नात्यांमधील गुंतागुंत दाखवणारी ही कथा तरुणाईला जवळची वाटत आहे. मालिकेत रिषीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ मेननने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्य, करिअर आणि प्रेमाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.
रिषीप्रमाणेच स्वतःलाही करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल साधावा लागतो का, असा प्रश्न विचारण्यात आला असता सिद्धार्थ म्हणाला, “मी ज्या क्षेत्रात काम करतो ते खूप मागणी करणारे आहे. काम करताना मी पूर्णपणे त्यात गुंतलेला असतो आणि मोकळा वेळ मिळाला की कुटुंबीयांसोबत राहण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा कामामुळे वाढदिवस, सण आणि कुटुंबातील महत्त्वाचे क्षण चुकले आहेत. मात्र काही वेळा प्रिय व्यक्तींना प्राधान्य देत कामालाही नकार दिला आहे.”
मुलाखतीदरम्यान रिषीने अनन्याला स्क्रिप्टबाहेर एखादा उशिरा रात्रीचा मेसेज पाठवला असता तर तो काय असता? असा मजेशीर प्रश्नही त्याला विचारण्यात आला. यावर तो हसत म्हणाला, “चल, आपण दोघं नोकऱ्या सोडून कुठेतरी दूर निघून जाऊया. दिवसाच्या शेवटी फक्त आपण दोघंच महत्त्वाचे आहोत. उद्याच करूया हे.”
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’बद्दल बोलताना सिद्धार्थने सांगितले की, ही प्रेमकथा पारंपरिक प्रेमकथांचे सर्व घटक जपत असली तरी ती आधुनिक आणि ताजी वाटते. रिषी आणि अनन्याचा प्रवास अत्यंत वास्तववादी असून प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशी त्याची सहज सांगड घालता येईल.
प्रेम आणि रोमॅन्सबद्दल मालिकेतून कोणता संदेश दिला जातो, याबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “रोमॅन्स साजरा केला पाहिजे. प्रेम ही आयुष्यातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रेम माणसाला घडवतं, बदलतं आणि वाढायला शिकवतं. त्यामुळे प्रेमासाठी मन खुलं ठेवा, प्रत्येक अनुभव स्वीकारा आणि या प्रवासाचा आनंद घ्या, हाच या मालिकेचा मुख्य संदेश आहे.”
रिषी आणि अनन्याच्या नात्यातील भावनिक चढ-उतार, करिअरची स्वप्नं आणि प्रेमासाठी केलेला संघर्ष यामुळे ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.






