( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Drishyam 3: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित ‘दृश्यम 3’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून, ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यावेळी कथेत काही नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता जयदीप अहलावत. त्याच्या एन्ट्रीमुळे अक्षय खन्नाच्या एक्झिटची चर्चा पुन्हा रंगली आहे.
‘दृश्यम 3’मध्ये जयदीप अहलावत अक्षय खन्नाच्या पात्राची जागा घेणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होती. विशेष म्हणजे अक्षय खन्नाने ‘धुरंधर’च्या यशानंतर मानधन वाढवल्यामुळे तो ‘दृश्यम 3’मधून बाहेर पडल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, आता खुद्द जयदीप अहलावतने या चर्चेवर भाष्य करत संपूर्ण चित्र स्पष्ट केलं आहे.
९ सप्टेंबरला गोव्यात ‘दृश्यम 3’च्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयदीप अहलावतला अक्षय खन्नासोबत होणाऱ्या तुलनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट केलं की, जेव्हा त्याला या भूमिकेबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा आपण अक्षयच्या पात्राची जागा घेत आहोत, असं त्याला कधीही सांगण्यात आलं नव्हतं.
जयदीपच्या मते, एका पात्राची कथा संपते आणि त्यानंतर दुसऱ्या पात्राची कथा सुरू होते. त्याच्या व्यक्तिरेखेचा स्वतःचा वेगळा प्रवास, स्वतंत्र ओळख आणि वेगळी नाती आहेत. त्यामुळे अक्षय खन्नाने साकारलेल्या पात्राशी त्याची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही.
तब्बूसोबतही वेगळं नातं
जयदीप अहलावतने त्याच्या व्यक्तिरेखेच्या नात्यांबद्दलही भाष्य केलं. चित्रपटात तब्बूने साकारलेल्या मीरा या पात्रासोबत त्याचं नातंही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे याआधी साकारलेल्या पात्राशी तुलना करण्याचा कोणताही दबाव आपल्यावर नसल्याचं जयदीपने सांगितलं.
‘दृश्यम 3’मध्ये जयदीप अहलावत पोलीस अधीक्षक (गुन्हे शाखा) राजवीर सिंग तोमर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची एन्ट्री अजय देवगणच्या विजय साळगावकरच्या आयुष्यातील अडचणी वाढवणारी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जयदीपची व्यक्तिरेखा कथेत नेमकी काय भूमिका बजावणार, याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, डिसेंबर २०२५मध्ये अक्षय खन्ना ‘दृश्यम 3’मधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी निर्माते कुमार मंगत पाठक यांनी करार झाल्यानंतर अक्षयसोबत काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याचा दावा केला होता. यामध्ये मानधन आणि चित्रपटातील त्याच्या भूमिकेशी संबंधित मुद्द्यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात होतं.
यानंतर निर्मात्यांनी जयदीप अहलावतला सिनेमात घेतलं. मात्र, त्यावेळीही दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी जयदीप हा अक्षय खन्नाची जागा घेत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. जयदीपसाठी स्वतंत्र आणि नवीन पात्र लिहिण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
त्यामुळे ‘धुरंधर’नंतर अक्षय खन्नाची वाढलेली फीस आणि त्यातून ‘दृश्यम 3’मधून त्याचा पत्ता कट झाला, या चर्चांपेक्षा जयदीप अहलावतची भूमिका स्वतंत्र असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विजय साळगावकरसमोर राजवीर सिंग तोमर कोणतं नवं आव्हान उभं करणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.






